डॉ. अरुण स्वादी
के.एल.राहुलचा फॉर्म हा संपूर्ण देशाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न झाला आहे.प्रत्येक जण या विषयावर पोटतिडकीने बोलतोय..जणू काही हा आमच्या क्रिकेटच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. या क्षणी जर सार्वत्रिक मतदान घेतले तर राहुल विक्रमी मतांनी घरी विश्रांतीसाठी जाईल. मी काही राहुलचा समर्थक नाही.सध्या तो जसा खेळतो आहे ते पाहिल्यावर सासरेबुवा सुनील शेट्टी पण त्याला आपल्या क्रिकेट संघात घेणार नाहीत.
पण खरेच राहुल इतका सामान्य फलंदाज बनला आहे? खरंच त्याला तिन्ही फॉरमॅटमधून डच्चू दिला पाहिजे? का हा टीकेचा भडिमार अनाठायी आहे? या क्षणी तरी के एल.ला कसोटी संघातून वगळले पाहिजे यात शंका नाही. तो फॉर्मात नाही, योगायोगाने त्याची जागा घेणारा शुबमन गिल विलक्षण फॉर्मात आहे हे देखील तितकेच महत्वाचे आहे.गेल्या काही महिन्यात शुबमनने सगळ्या फॉरमॅटमध्ये धावांच्या राशी ओतल्या आहेत.त्याची बॅट गरजते आहे, बरसते आहे. गोलंदाजांना तो संधीच देत नाहीये.अशा वेळी त्याला न घेता लटपटणार्या, अडखळणार्या राहुलला खेळवत राहायचे हे कितपत योग्य आहे? बरे, राहुलच्या फक्त धावा होत नाहीत असेही नाही. त्याच्या आत्मविश्वासाला मोठे भगदाड पडले आहे. या उलट शुबमन विलक्षण जोशात आहे. असे असूनही त्याला राहुल ऐवजी संघात घेतील का हा मोठा सवाल आहे.
भारताची रणनीती बघता व रोहितचा कल पाहता राहुलला इंदोरला खेळवले जाऊ शकते.इतिहास पाहता असेच होईल.पण 2-0 च्या बढती नंतर, कोणी सांगावं , आमची निवड समिती गिलला निवडायची खेळी करेल. गेली दोन-तीन वर्षे राहुलच्या मागे फिटनेसची साडेसाती लागली आहे. कधी पाठ तर कधी हॅमस्ट्रिंग इन्जुरी त्याची पाठ सोडत नव्हती. त्यानंतर सुरू झालं स्पोर्ट्स हर्नियाचे अवघड दुखणं… आता तो सर्जरी करून आलाय. पूर्वीही कारकिर्दीच्या सुरुवातीला तो दोनचार डावानंतर कुठेतरी चमक येऊन नादुरुस्त झाला आहे. या सर्वांचा परिणाम खेळावर होणारच..पण कसोटी सामन्यात त्याचे तंत्र पार उघड्यावर पडले.खेळायला निघालेला चेंडू अचानक सोडताना तो बॅटवर लागून स्टंपकडे आकर्षित होणारा त्याचा केविलवाणा बचाव म्हणजे डोळ्यांना शिक्षा होती. त्यातच एकदा पाय गर्तेत अडकल्यावर आणखी खोल खोल जातो तसे त्याचे होऊ लागले.
बाद व्हायचे विविध प्रकार तो शोधू लागला. ऑस्ट्रेलियातल्या वर्ल्ड कप मधले मात्र त्याचे संपूर्ण अपयश सर्वांच्या नजरेत आले. त्याला पाठीशी घालून कर्णधार रोहित टीकेचा धनी झाला आणि नेतृत्व गमावून बसला.टी20 च्या सामन्यात सलामीवीर राहुल पाहिले षटक पिच जज करण्यासाठी निर्धाव खेळून काढत होता हे मात्र राजपाल यादवच्या कॉमेडीपेक्षा खतरनाक होते. इथे त्याने स्वतःबरोबर देशाचं नाक कापलं… आणि तरीही तो भारतात वन डे खेळला. मात्र सलामीवीर म्हणून नाही…बरेही खेळला.तो यष्टीरक्षण करतो हा त्याचा संघात असण्याचा बोनस.!! पंतच्या अनुपस्थितीत त्याला यासाठी खेळवले जाते..मात्र सद्यस्थितीत त्याचे स्थान कोणत्याही प्रकारात निश्चित नाही. सुनील गावस्कर सर राहुलचे चाहते आहेत.आजही त्यांच्या मताला किंमत आहे.पण राहुलची भलावण करणे आता त्यांनाही शक्य नाही. इंदोरला राहुल गार्ड घेताना दिसला तर समजावे या देशात फक्त लौकिक महत्त्वाचा….फॉर्म कवडीमोल असतो….