डॉ. अरुण स्वादी
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार व फलंदाज आणि खोचक, पण मर्मभेदी टीका करणारा माजी समालोचक इयान चॅपेल फिरकी गोलंदाजीविरुद्ध न डगमगता खेळणारा एक अद्वितीय फलंदाज होता. ऑस्ट्रेलियाचे सध्याचे फलंदाज ज्या पद्धतीने ‘भारतीय फिरकी’चा सामना करत आहेत ते पाहून ते जाम वैतागले आहेत आणि खरेच आहे म्हणा! स्वीप आणि रिव्हर्स स्वीप दोनच फटके मारून, चेंडू खाली राहणार्या खेळपट्टीवर फिरकीचा नेटाने सामना कसा करता येईल?
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
पाहिल्या डावात चेंडू खाली राहत नव्हता तेव्हा उस्मान ख्वाजाने 80 टक्के धावा स्वीप व रिव्हर्स स्वीप करत जमवल्या. भारतीय उपखंडातील अलीकडच्या काळातला तो सर्वात यशस्वी कांगारू फलंदाज, पण दुसर्या डावात हाच फटका त्याने अस्ताला जाणार्या सूर्याला साक्ष ठेवून मारला व भारताला गिफ्ट दिली. मला वाटते या कांगारू फलंदाजांनी 1969-1970 च्या फिल्म्स पाहिल्या पाहिजेत. इयान चॅपेल, डग वॉल्टर्स, रेडपाथ यांचे पदलालित्य पाहायला पाहिजे. प्रसन्ना, बेदी वेंकट राघवनला ते क्रिज सोडून पुढे सरसावून कसे कवर्समधून सीमापार करत होते किंवा बॅकफूटवर येऊन ते स्क्वेअर कट कसे करत होते ते बघायला पाहिजे होते. त्यावेळचे आमचे फिरकी गोलंदाज असामान्य दर्जाचे होते.
विशेषतः प्रास, बेदी, चंद्रा तर निव्वळ अलौकिक होते. तरीही हे फलंदाज क्रिजची लक्ष्मणरेखा जुमानत नव्हते. त्यावेळी आमच्या फिरकीला या कांगारू फलंदाजांनी खूपदा निरुत्तर केले. नंतर रिकी पाँटिंग कर्णधार असताना आलेल्या ऑस्ट्रेलियन टीमच्या काही फलंदाजांनी, उदाहरणार्थ डॅनियन मार्टिन, अॅडम गिलख्रिस्ट यांनीही भारतात भारतीय फिरकीचा नेटाने सामना करत सीरिज खिशात टाकली.
मार्टिन तर वक्काच्या म्हणजे पर्थच्या तेज खेळपट्टीवर फलंदाजी करून मोठा झालेला, पण भारतात आल्यावर एकदम फ्रंटफूट किंवा बॅकफूटवर कमिट व्हायचे नाही हे तो ताबडतोब शिकला. त्याची विकेट घेणे भारतासाठी अतिशय जिकिरीचे बनले होते. सध्याच्या टीममधल्या हॅन्डसकोंबने हेच टेकनिक गिरवले होते. त्याचे कमनशीब हेच की त्याला दिल्लीत जडेजाने दोन अप्रतिम बॉल टाकले व त्याची विकेट घेतली. थोडक्यात, फिरकीला कसे खेळायचे यात ऑस्ट्रेलियाचे फलंदाज पूर्णपणे अनभिज्ञ नाहीत. तरीदेखील ते स्वीप एके स्वीप करत खेळत राहिले. त्यामुळे त्यांचे तेलही गेले आणि तूपही गेले, हाती धुपाटणे आले.
पेट कमिंसचे कसोटी रेकॉर्ड खूप छान आहे. त्याने ऑस्ट्रेलियामध्ये अॅशेस जिंकल्या आहेत. कधी नव्हे ते दक्षिण आफ्रिकेला मायदेशात पराभूत करायचा विक्रमही त्यांनी केला आहे. वेस्टइंडिज तर चारी मुंड्या चीत झाले आहे. एवढेच नव्हे तर भारतीय उपखंडात श्रीलंकेमध्ये त्याने कसोटीत बरोबरी केली आणि पाकिस्तानमध्ये बाबर आजमच्या संघाला हरवले. ही मोठी कामगिरी होती. त्यामुळे यावेळी भारतात येऊन भारताच्या फिरकीवर हल्लाबोल करून आणि त्यांना नेस्तनाबूत करून मालिका विजय मिळवायचाच, असे स्वप्न उराशी बाळगून या ऑस्ट्रेलियन संघाने भारतात प्रवेश केला होता, पण आता त्यांची अस्तित्वाची लढाई सुरू आहे. अजूनही ते पुढचे दोन्ही सामने जिंकू शकतात, पण इंदोरच्या खेळपट्टीचे अंतरंग पाहिल्यावर तिथे तरी त्यांची डाळ शिजणे अवघड वाटते. अहमदाबादला तर ‘वरून’ ऑर्डर आलेली असेल म्हणजे मामला त्यांच्यासाठी गंभीर आहे.
माझी कर्णधार अॅलन बॉर्डरचे म्हणणे वेगळेच आहे. ऑस्ट्रेलियाची टीम पूर्वीसारखे विन ट एनी कॉस्ट खेळत नाही. प्रतिस्पर्ध्याला मान देतात. स्लेजिंग करत नाहीत. त्यामुळे विरुद्ध संघावर दबाव येत नाही. या ऑस्ट्रेलियन टीमने ते पूर्वी जसे खेळायचे तसे खेळावे, असा अनाहूत सल्ला बॉर्डरने दिला आहे, पण पॅटला ते बिलकूल मान्य नाही. तो म्हणतो, खेळ म्हटला की जिंकणे-हरणे आलेच. आम्ही सुसंस्कृत क्रिकेट खेळणार. मला वाटते. सेंड पेपर गेटनंतर शहाण्या झालेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटला व खेळाडूंना बोर्डरने चुकीचे सल्ले देऊ नयेत. क्रिकेट बदलते आहे. जुन्या खोंडांनी हे समजून घेतले पाहिजे.