डॉ. अरुण स्वादी Dr. Arun Swadi
पाकिस्तानने अलगदपणे आपल्या खांद्यावरचे ओझे झिंबाब्वेच्या खांद्यावर टाकले आहे. झिंबाब्वेने भारताला हरवले तर बांगलादेशला हरवून पाकिस्तान उपांत्य फेरीत प्रवेश करू शकतो. त्यासाठी संपूर्ण पाकिस्तान झिंबाब्वेच्या पाठीशी उभा राहून त्यांना रविवारी प्रोत्साहन देऊ शकतो. परंतु हे वाटते तेवढे सोपे नाही.
झिंबाब्वेच्या तरुण संघाने पाकिस्तानचा घास गेला खरा, पण भारतालाही तसेच चकित करणे वाटते तितके सोपे नाही. म्हणतात ना वीज एकाच जागी दोनदा पडत नाही, पण शेवटी हा खेळ आहे आणि टी-20 मध्ये असे चमत्कार कधीतरी घडत असतात. त्यामुळे झिंबाब्वेने भारताला धोबीपछाड द्यायची शक्यता अगदीच नाही असेही नाही.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4 बाद 41 धावसंख्या असतानाही इफ्तिकार आणि शादाब यांनी तुफानी फटकेबाजी करत सामना रंगतदार बनवला. त्यानंतर दक्षिण आफ्रिका शाहीन आफ्रिदीसमोर सुरुवातीलाच लटपटली. हे बळी शाहीनच्या स्विंगपेक्षा अचूकतेमुळे मिळाले होते. मग पावसाने त्यांची पुरी वाट लावली आणि टेंबवा बवुमाच्या टीमचा मोठा पराभव झाला. त्यामुळे पाकचा नेट रन रेट सुधारला आणि या काडीच्या आधारावर आता ते भारताला बाहेर काढून स्वतः उपांत्य फेरीत जायच्या वल्गना करत आहेत.
पाकिस्तानने बांगलादेशला हरवणे सोपे ठरू शकते. कारण उपांत्य फेरीत जाण्यासाठी बांगलादेशला, पाकिस्तानला मोठ्या फरकाने हलवावे लागेल. हे द्रोणागिरी उचाळण्याएवढे मोठे आहे. अवघड आहे. तसे करताना बांगलादेशाचा धुव्वा उडून मोठा पराभव व्हायची शक्यता आहे. एरवीही पाकिस्तानने बांगलादेशला फक्त हरवले तरी चालण्यासारखे आहे. त्यांचा नेट रन रेट भारतापेक्षा चांगला झाला आहे. म्हणून पाकिस्तानने हे गणित गृहीत धरले आहे. फक्त झिंबाब्वेने भारताला आडवे करावे मग त्यांचे काम फत्ते होईल, असा त्यांचा मनसुबा आहे.
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने जेवढे वाईट खेळता येईल तेवढे खेळून घेतले. सुरुवातीच्या चांगल्या गोलंदाजीनंतर त्यांनी शेवटची दहा षटके नॉरकेचा अपवाद सोडला तर वाईट टाकली. क्षेत्ररक्षण त्याहून वाईट केले. एकामागोमाग एक झेल सोडले. त्यातले काही झेल अवघड होते हे खरे, पण दिव्य परंपरा लाभलेल्या देशाने असे क्षेत्ररक्षण करणे लाजिरवाणे होते. हेही नसे थोडके म्हणत त्यांनी त्याहून वाईट फलंदाजी केली. डी कॉकला सध्या धावांचा दुष्काळ पडलाय. कर्णधार दुष्काळातून आताच बाहेर पडतोय. मिलर या सामन्यात खेळला नाही.
या पार्श्वभूमीवर हा निराशा जनक खेळ अनपेक्षित नव्हता. पाकिस्तानच्या दर्जेदार गोलंदाजांनी याचा फायदा उठवला. पावसाने ही मदत केली आणि एकतर्फी सामन्यात जिंकून नेट रन रेट ही वाढवला. भारतीय संघाने ग्रुप स्टेजमध्ये एकमेव सामना गमावला असला आणि तीन विजय मिळवले असले तरी एकूणच त्यांचा खेळ अपेक्षेएवढा चांगला होत नाही. उलट त्यातील दोन सामने त्यांनी शेवटच्या चेंडूवर जिंकले. हे सामने ते हरायचीच शक्यता जास्त होती. थोडक्यात, एका बाजूला चुरशीचे सामने जिंकायचा अनुभव त्यांना फायदेशीर ठरू शकला तरी एकूणच संघ म्हणून ते या घटकेला तरी जबरदस्त खेळताना दिसत नाहीत. एक सोपे अंकगणित त्यांना सांगायला हरकत नाही. यापुढचे तीनही सामने त्यांनी जिंकले तरच ते विश्वचषक जिंकू शकतील.