नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
बंगळुरूमध्ये बुधवारी ४ जून रोजी झालेल्या दुर्घटनेमुळे आरसीबीच्या विजयी सत्कार सोहळ्याला गालबोट लागले. एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत आरसीबीच्या ११ चाहत्यांचा मृत्यू झाला तर ३० हून अधिक लोक जखमी झाले. या घटनेवरून सोशल मीडियात संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यात आरसीबी टीम फ्रेंचायसीकडून मृतांच्या वारसांना आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे.
आरसीबीने मृतांच्या कुटुंबासाठी प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच मृतांच्या कुटुंबियांना मदत करता यावी, यासाठी आरसीबीकडून ‘आरसीबी केअर्स’ नावाचा एक निधी देखील तयार केला जात आहे. याबाबतची माहिती आरसीबीकडून सोशल मीडियावरुन देण्यात आली आहे.
निवेदन केले जाहीर
आरसीबी टीम फ्रेंचायसीने निवेदन जारी करत म्हटले की, बंगळुरूत घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे आरसीबी कुटुंबाला खूप वेदना झाल्या आहेत. चाहत्यांचा आदर आणि निष्ठेचे प्रतीक म्हणून ११ मृतांच्या कुटुंबाला १० लाख रूपयांची आर्थिक मदत जाहीर करत आहोत. सोबतच या घटनेतील जखमी झालेल्या चाहत्यांना मदत करण्यासाठी आरसीबी केयर्स नावाचा फंड तयार केला जात आहे. आमचे चाहते कायम आमच्या हृदयाच्या केंद्रस्थानी राहतील. या दु:खात आम्ही एकत्र आहोत असे त्यांनी म्हटले.
तसेच याबाबत दुर्घटनेबाबत माहिती होताच कार्यक्रम थांबवून प्रशासनला सहकार्य केल्याचे या निवदेनात म्हटले. मात्र तेव्हा आरसीबीने आर्थिक मदत जाहीर केली नव्हती. मात्र त्यानंतर काही तासांनी अखेर आरसीबीने मनाचा मोठेपणा दाखवत आपल्या टीमच्या मृत्यू पावलेल्या चाहत्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याचा निर्णय घेतला.
𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗦𝘁𝗮𝘁𝗲𝗺𝗲𝗻𝘁: 𝗥𝗼𝘆𝗮𝗹 𝗖𝗵𝗮𝗹𝗹𝗲𝗻𝗴𝗲𝗿𝘀 𝗕𝗲𝗻𝗴𝗮𝗹𝘂𝗿𝘂
The unfortunate incident in Bengaluru yesterday has caused a lot of anguish and pain to the RCB family. As a mark of respect and a gesture of solidarity, RCB has announced a financial… pic.twitter.com/C50WID1FEI
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) June 5, 2025
आयपीएलच्या १८ व्या सीजनमध्ये पहिल्यांदाच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीमने आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरले. त्यानंतर बुधवारी आरसीबी टीम अहमदाबादहून बंगळुरूला पोहचली. याठिकाणी टीमची एक झलक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमी जमले होते. या खेळाडूंना एअरपोर्टहून विधानसभा आणि तिथून चिन्नास्वामी स्टेडियमला सत्कार सोहळ्यासाठी नेण्यात आले. आरसीबी टीमची विजयी परेड काढण्यात येणार होती परंतु गर्दीचा अंदाज न आल्याने सुरक्षेच्या कारणास्तव टीमला थेट स्टेडियमला नेण्यात आले. एम चिन्नास्वामी स्टेडियमची आसन क्षमता ही 30-35 हजार इतकी आहे. त्यात या कार्यक्रमासाठी चाहत्यांना फ्री एन्ट्री होती. त्यामुळे ही तोबा गर्दी झाली. स्टेडियम पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर गेट बंद करण्यात आले. त्यामुळे सुरक्षारक्षक आणि चाहत्यांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. त्यामुळे जमावला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. त्यामुळे धावाधाव झाली. यात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे 11 जणांचा मृत्यू झाला.
हायकोर्टाने फटकारले
बंगळुरूत झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर कर्नाटक हायकोर्टाने आयोजकांना फटकारले. एवढ्या मोठ्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी काय मार्गदर्शक सूचना नव्हती का, मेडिकल स्टाफ, रुग्णवाहिकेची व्यवस्था असायला हवी होती का? गर्दी नियंत्रणाच्या बाहेर गेल्यावर काय उपाययोजना होत्या. जखमींना तातडीने रुग्णालयात का भरती केले नाही? यासारखे प्रश्न हायकोर्टाने आयोजकांना विचारले आहे. सरकारने या घटनेवर त्यांचा रिपोर्ट सादर करावा असे निर्देशही कोर्टाने देत पुढील सुनावणी १० जून रोजी ठेवली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा