मुंबई | Mumbai
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी (Bhaiyyaji Joshi) यांनी मराठी (Marathi) भाषेसंदर्भात केलेल्या वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. जोशी यांनी घाटकोपरमध्ये एका कार्यक्रमात बोलतांना ‘मुंबईत (Mumbai) राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी यायलाच हवी असे गरजेचे नाही, असे विधान केले होते. यानंतर त्यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जात होती. त्यानंतर अखेर याबाबत भैय्याजी जोशी यांनी माध्यमांशी बोलतांना खुलासा केला आहे.
यावेळी ते म्हणाले की,”मी केलेल्या एका विधानामुळे गैरसमज झालेला आहे, असं मला वाटतं. महाराष्ट्राची (Maharashtra) भाषा मराठी आहे आणि मुंबई ही महाराष्ट्राचाच भाग आहे. त्यामुळे मुंबईची भाषा मराठी याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. भारताचं आपलं एक वैशिष्ट्य आहे की इथे विविध भाषा बोलणारे लोकसुद्धा परस्परांना बरोबर घेऊन चालतात. त्यात कुठेही भाषेमुळे प्रश्न निर्माण होत नाही. हे जगासमोर एक आदर्श उदाहरण आहे”, असे भैय्याजी जोशी यांनी म्हटले.
जोशी पुढे म्हणाले की, “मुंबईतही बहुभाषिक लोक आहेत आणि ते परस्परांवर स्नेहसंबंध ठेवूनच मुंबईचे जीवन चालतं आहे.स्वाभाविकपणे आमची सर्वांची अपेक्षा असते की बाहेरून येणाऱ्यांनी त्यांच्या भाषेसह मराठी भाषाही शिकावी, त्याचं अध्ययन करावं. मराठी भाषा ही सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध भाषा आहे. ती अनेकांनी अभ्यासावी असंच आम्हाला वाटतं. माझ्या वक्तव्यावर जे राजकारण सुरु आहे त्यावर मी बोलू इच्छित नाही, तो माझा विषय नाही”, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
भैय्याजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर विधानसभेत बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले की, “भैय्याजी जोशी यांचं वक्तव्य मी ऐकलेलं नाही, ते पूर्णपणे ऐकून माहिती घेऊन बोलेन. पण सरकारची भूमिका पक्की असून मुंबई, महाराष्ट्र आणि महाराष्ट्र शासनाची भाषा मराठीच आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे. प्रत्येकाला मराठी बोलता यायल पाहिजे. माझ्या या वक्तव्यात भैय्याजी जोशी यांचं दुमत असेल असं मला वाटत नाही. इतर कोणत्याही भाषेचा अपमान करणार नाही, सर्व भाषांचा सन्मान आहे. जो स्वत:च्या भाषेवर प्रेम करतो तो दुसऱ्याही भाषेवर प्रेम करू शकतो म्हणूनच शासनाची भूमिका पक्की असून शासनाची भूमिका मराठी” असल्याचे त्यांनी सांगितले.