माळवाडगाव |वार्ताहर| Malwadgav
योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज सप्ताहात लाखो घराघरातून आलेल्या भाकरीस माधुकरी म्हणतात, मधमाशा फुलाफुलातून मकरंद गोळा करून आरोग्यदायी मध बनवतात, तसे अखंड भगवंताच्या चिंतनात सर्व जाती-धर्माचे लोक घराघरातून गोळा झालेल्या या भाकरी अन् स्वादिष्ट बनविलेल्या आमटी महाप्रसाद घेवून प्रसन्न होतात. चित्त शुध्दीने बनविलेल्या भ़ोजनात प्रसन्नता असते, म्हणून त्याला प्रसाद म्हणतात. हा प्रसाद सेवनाने भाविकांची मन शुध्दी होत असल्याचे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी सप्ताहाच्या पाचव्या दिवशीच्या प्रवचनातून उपस्थित लाखो भाविकांना उपदेश करताना केले.
श्रीरामपूर – वैजापूर तालुका हद्दीवरील गोदातीरावरील शनिदेवगाव सप्तक्रोशी येथे सुरू असलेल्या योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहामध्ये काल रविवार सुट्टीमुळे पाच लाखांहून अधिक भाविकांनी आमटी भाकरी महाप्रसाद, योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज पादुका, शनैश्वर देवस्थान दर्शन व महंत रामगिरी महाराज सत्संग प्रवचनाचा लाभ घेतला. महंत रामगिरी महाराजांनी भगवदगीतेच्या 11 अध्यायातील 54 श्लोकांवर भगवंतांची अनन्य भक्ती यावर उपस्थित भाविकांना उपदेश केला. उपदेश करताना महाराज पुढे म्हणाले की, भगवंताची प्रिती अखंड अभावी, अखंड भगवंताचे चिंतन, प्रेम असणार्या या सप्ताहात सत्संगाचा अन् आमटी भाकरी महाप्रसादाचा लाभ आहे.घरी कितीही प्रयत्न करा, मसाला टाका, परंतू या आमटी सारखा स्वाद येणे नाही.
ज्या भोजनात प्रसन्नता असते, त्याला प्रसाद म्हणतात. त्या भोजनात स्वारूप्य, स्वारस्य, सुगंध, स्वादिष्ट हे चार गुण असावेत. गंध, रंग चांगला असावा. शरिराला पुष्टी अन् भुक निवारण्याची क्षमता असावी. भगवंताच्या चिंतनात अन्न तयार केलेले असावे. सेवन केलेल्या अन्नाचे जठरात तीन भाग आहे. पहिला स्थुल भाग, मलमुत्र शरिरातून विसर्जित करतो. दुसरा मध्य भाग व्हिटॅमिन व शरिराची पोषण करतो, तिसरा भाग सुक्ष्म शरिरातील संस्कार घडवतो, म्हणून आपण कुठल्या ठिकाणचे अन्न सेवन केले, त्यानुसार अन्नाच्या सुक्ष्म म्हणजे संस्कार, परिणाम मनुष्य बुद्धीवर होत असल्याचे शेवटी महाराजांनी सांगितले.
आजच्या सप्ताहास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संदिपान भुमरे, रमेश बोरनारे, श्रीरामपूरचे आ.हेमंत ओगले, माजी आ.भानुदास मुरकुटे, माजी सभापती बाबासाहेब जगताप, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, सचिन गुजर, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, जि.प.माजी सभापती बाबासाहेब दीघे, अविनाश गलांडे, संतोष जाधव, अशोकच्या संचालिका मंजुश्री मुरकुटे, निरज मुरकुटे, गणेश छल्लारे, आण्णासाहेब डावखर, भरत दळे, बाजार समिती संचालक गिरिधर आसने, भाजपा तालुका सरचिटणीस डॉ. शंकर मुठे, भैरव कांगुणे, संदिप पारख, बाबासाहेब कोते, सुधाकर शिंदे, अॅड. विलास आसने, गणेशाचे संचालक नानासाहेब नळे, राहता भाजपा सरचिटणी संदिप लुटे, अस्तगावकर सराफचे अशोक बोर्हाडे, ओबीसी मोर्चाचे प्रकाश पुंड, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रविण वाकचौरे, सुनील आंधळे आदी उपस्थित होते.
सप्ताहातील गंगागिरी कृषी प्रदर्शनाने लाख़ो भाविकांना घातली भुरळ
पुणे, नाशिकच्या धरतीवर गंगागिरी महाराज कृषी प्रदर्शनात 300 हुन अधिक कौटुंबिक वापराचे विविध स्टॉल लावण्यात आल्याने पंचक्रोशीतील भाविक सहकुटुंब फेरफटका, खरेदी झाल्यावर रूचकर स्वादिष्ट खाऊगल्लीच्या स्टॉल कक्षात येऊन आनंद घेताहेत. काल दुपारी महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते विजय पवार यांनी खरेदी केलेल्या ट्रॅक्टरचे पुजन करण्यात आले. पुजनानंतर महंत रामगिरी महाराज यांनी संपुर्ण प्रदर्शनाची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
तीन कि.मी. वाहतूक ठप्प झाल्याने भाकरी घेऊन येणारे वाहने अडकली
काल भाकरी स्वागत कक्ष कमालपूर येथे उभारून भाकरी ताब्यात घेवून बंधार्याहून कमिटीच्या ट्रॅक्टरने नेण्यात आल्या. स्वयंसेवक वाढविल्याने सुरळीतपणा आला. मात्र, बंधारा जाम होवू नये म्हणून श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरूण धनवडे यांनी भामाठान रस्त्यावरील वाहतूक माळवाडगांवहून नागमठान पुलावरून वळविली. त्यामुळे हमरापूर, अवलगाव रस्ता जाम होऊन भाकरीची वाहने अडकली. पर्यायाने पगंतीतीत लाखो भाविकांना भाकरीची प्रतिक्षा करण्याची वेळ आली. आज भामाठान रस्ता बंद करण्यात येऊ नये, म्हणून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घार्गे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
उद्या मंगळवार दि. 5 ऑगष्ट रोजी खासदार संदिपान भुमरे, आमदार रमेश बोरनारे यांची खिचडी पगंत असल्याने या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. यासाठी सप्ताहस्थळ पायथ्याशी देवगाव नजीक हेलिपॅड तयार करण्यात आला आहे.





