शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
भारत पाकिस्तान युद्धजन्य परीस्थितीच्या पार्श्वभूमीवर साई संस्थान प्रशासनाने मोठा निर्णय घेतला असून रविवार 11 मे पासून साई समाधी मंदिरात फुल, हार, प्रसाद नेण्यास मनाई असणार आहे. या निर्णयाची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी सुरक्षितेतच्या दृष्टीने साई संस्थानच्या सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेतला. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, अतिरिक्त अपर पोलीस अधीक्षक श्री. कलबुर्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, शिर्डीचे पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे, पी. आय. प्रदीप देशमुख आदींसह संस्थानचे सुरक्षा अधिकारी उपस्थित होते.
यावेळी साई मंदिर सुरक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. शिर्डीत देश-विदेशात दररोज हजारो भक्त साई समाधीच्या दर्शनासाठी येतात, फुलहार आणि प्रसाद साई समाधीवर चढवतात. भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर भाविकांना फुलहार आणि प्रसाद साई समाधी मंदिरात नेण्यास आता मनाईचा असणार आहे. तसा निर्णय पुढील आदेशापर्यंत घेण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच साई संस्थानला धमकीचा मेल देखील प्राप्त झाला आहे. या अगोदर अनेकदा धमकीचे पत्र देखील मिळाले आहे. परंतू यावेळची परिस्थिती वेगळी आहे.
भारत-पाकिस्तान या दोन्ही देशातील तणावाची परिस्थिती आणि पाकिस्तानकडून सुरू असलेल्या ड्रोन हल्ल्यामुळे साई संस्थानची सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्यात आली आहे. पवित्र सुवर्ण मंदिर असलेल्या अमृतसर शहरावर पाकिस्तानने ड्रोनचा हल्ला चढवला होता. भारतीय लष्कराने हा हल्ला निष्फळ केला. परंतु या हल्ल्यामुळे पाकिस्तान भारतातील धार्मिक स्थळ टार्गेट करत असल्याचे निश्चित झाले. यामुळे भारतातील प्रमुख धार्मिक स्थळांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस यंत्रणेला कडक उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या असून सुरक्षिततेच्या दृष्टीने हार, फुल, प्रसाद बंदीचा मोठा निर्णय घेतला आहे.
भारत पाक युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणी राज्य सरकारच्या आदेशानुसार आंतरराष्ट्रीय साईबाबा विमानतळावर कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली असून शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्यात येत आहे. शिर्डी विमानतळवरून नियमित येणार्या जाणार्या फ्लाईट सुरु ठेवण्यात आल्या असून यामध्ये अद्यापतरी कोणताही बदल केला नाही.
– कृष्णा पॉल, एपीडी, शिर्डी विमानतळ