शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
द्वारकामाई मंदिरात भाविकांना दर्शनासाठी जवळ जाऊन द्यावे. साईबाबांच्या समाधीवर लावलेल्या काचा काढून भाविकांना बाबांच्या समाधीला हात लावून दर्शन घेऊ द्यावे, गुरुस्थान जवळील जाळ्या काढाव्यात. या मागण्यांची संस्थानने तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करू, असा इशारा शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते यांनी दिला आहे.
जगभरातील लाखो साईभक्त बाबांचे दर्शन घेण्याकरिता शिर्डीत येऊन बाबांसमोर नतमस्त होतात. साईबाबांच्या श्रद्धेपोटी समाधीचा स्पर्श करून तसेच द्वारकामाई मंदिरात जवळ जाऊन प्रतिमेचे दर्शन घेता यावे अशी अनेक साईभक्तांची इच्छा आहे. परंतु समाधीला लावलेल्या काचा व जाळ्यांमुळे बाबांच्या पादुका व समाधीला स्पर्श करता येत नाही. यामुळे भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. दर्शन रांगेत तासन्तास उभ्या असलेल्या भक्तांना साई समाधीला तसेच पादुकांना स्पर्श न करता आल्याने नाराजी पसरत आहे. परंतु व्हीआयपी लोक समाधीस्थळाच्या काचा काढून दर्शन घेतात हा भक्तांमध्ये होत असलेला दुजाभाव आहे.
साईबाबांच्या मंदिरात दर्शनाची प्रतीक्षा करणार्या भक्तांसाठी समाधीवर काच नसली तर साईभक्तांना बाबांच्या समाधीस स्पर्श, बाबांच्या पादुकांना हात लावून मनोभावे दर्शन घेता येऊन भक्तांना मोठे समाधान वाटेल. तसेच द्वारकामाई मंदिरात भाविकांना पुर्वीप्रमाणे दर्शनासाठी वरच्या चबुतर्यावर जाऊ द्यावे व द्वारकामाई मंदिर रात्रभर उघडे ठेवावे. गुरुस्थानजवळील उत्तर बाजूस असलेल्या जाळ्या काढून मंदिर परिसर मोकळा करावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते यांनी सांगितले.