श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda
शहराचे ग्रामदैवत संत श्री शेख महंमद महाराज यांच्या मंदिराची वक्फ बोर्डाकडे करण्यात आलेली नोंदणी रद्द करावी तोपर्यंत कुठल्याही प्रकारची चर्चा होणार नाही असा ठराव शनिवारी(दि.19) गावकर्यांनी एकमताने मान्य करत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिर जीर्णोद्धारासाठी आणि दर्गाह ट्रस्टच्या विरोधात गावकर्यांनी, वारकर्यांनी पुकारलेल्या बंद शनिवारी मागे घेण्यात आला. पण, तोडगा निघेपर्यंत तहसील कार्यालयासमोर सुरू असलेले धरणे आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.
जेष्ठ नेते घनश्याम आण्णा शेलार म्हणाले, संत शेख महंमद महाराज मंदिराची नोंदणी दर्गा ट्रस्टने वक्फ बोर्डाकडे केली आहे ती रद्द करण्यात यावी. दर्गा ट्रस्ट नावाऐवजी देवस्थान असा बदल करता येईल पण वक्फकडे दर्गाचे देवस्थान कसे होईल? असा सवाल त्यांनी केला. वारकरी, गावकर्यांची संत शेख महमंद महाराज यांच्यावर मोठी श्रद्धा आहे. आमीन शेख यांनी 2008 साली चुकीचे पुस्तक लिहल्याने वाद झाला होता. त्यांनतर मंदीर वक्फ बोर्डाकडे नोंदणी केली आहे. हे कुणाला मान्य नाही. संत शेख महंमद यांनी संजीवन समाधी घेतली. संत शेख महंमद हे हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक आहेत, असे शेलार म्हणाले.
यावेळी माजी आमदार राहुल जगताप म्हणाले, वक्फ बोर्डाकडील नोंदणी रद्द करण्यासाठी सरकारकडे आपल्याला पाठपुरावा करावा लागेल. यावेळी बाळासाहेब नाहटा, व्यापारी असोसिएशनचे सतीश बोरा, प्रा.बाळासाहेब बळे, राहुल कोठारी, अमोल दंडनाईक, चंद्रकांत कोथिंबीरे, विजय मुथा, सुदाम झुंजरुक यात्रा समिती अध्यक्ष गोपाळ मोटे आदी उपस्थित होते.
जीर्णोद्धारास विरोध नाही
दरम्यान, शेख महंमद बाबा देवस्थान जीर्णोद्धारास आमचा विरोध नाही. माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निधीतून देवस्थान सुशोभीकरणही केले आहे. पेव्हिंग ब्लॉक, हायमॅक्स दिवे, अशी विविध कामे लोकवर्गणीसह ट्रस्टच्या माध्यमातून केली आहेत. मात्र, आमच्यावर विकास कामात अडथळा आणल्याचा खोटा आरोप केला जात आहे, अशी माहिती सुफी हजरत शेख महंमद बाबा ट्रस्टचे अध्यक्ष व शेख महंमद बाबा यांचे वंशज आमीन शेख यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली. संत शेख महंमद महाराजांचे मंदिर बांधण्यासाठी त्यांच्या समाधी स्थळाभोवतालची जागा मोकळी करून मिळावी. तसेच, या समाधीस्थळाचा ताबा सांगणारा ट्रस्ट बरखास्त करावा, या मागणीसाठी श्रीगोंदा शहरात गुरुवारी (दि.17) बंद पाळून मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी अनेकांनी अमीन शेख यांच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली होती. शुक्रवारी (दि.18) प्रसिद्धी पत्रकाद्वारे शेख यांनी त्यांची भूमिका मांडली.