अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यातील संगमनेर, अकोले, कोपरगाव, राहाता, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, इगतपुरी, नाशिक, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, निफाड, सटाणा, कळवण, देवळा, मालेगाव, धुळे, साक्री, सिंदखेडा, शिरपूर आदी तालुके व नंदुरबार व जळगाव जिल्हे इत्यादी व लगतच्या परिसरात केवळ ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणी झालाच तर 2 ते 4 मि. मी. अशा किरकोळ हलक्या पावसाची शक्यता आहे.
राज्यातील फेब्रुवारी महिन्यांतील हवामानाबाबत माहिती देताना पुण्याचे हवामान तज्ज्ञ माणिकराख खुळे यांनी सांगितले की, हे ढगाळ वातावरण गुरुवार 5 फेब्रुवारीपासून निवळण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यांतील पहिल्या आठवड्यातील तापमानात शनिवार 7 फेब्रुवारीपर्यतच्या आठवड्यात महाराष्ट्रात पहाटे 5 च्या किमान तापमानाचा पारा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सरासरी तापमानापेक्षा 3 ते 4 डिग्रीने अधिक राहून थंडीऐवजी उत्तर कोकण व मध्य महाराष्ट्रतील 13 जिल्ह्यात रात्रीचा उकाडा जाणवेल.
उर्वरित महाराष्ट्रातील 23 जिल्ह्यात मात्र पहाटे 5 च्या किमान तापमानाचा पारा सरासरी इतका राहून संमिश्र वातावरणाच्या अनुभवातून केवळ माफक थंडीची शक्यता जाणवते. फेब्रुवारी महिन्यांतील उर्वरित 3 आठवड्यात महाराष्ट्रात थंडी जाणवेल. परंतु मुंबईसह संपूर्ण कोकण, खांदेश व मध्य महाराष्ट्र व छत्रपती संभाजीनगर व जालना आशा 19 जिल्ह्यात मात्र थंडीचे प्रमाण मात्र कमी असेल. संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रात भागानुसार पावसाचे प्रमाण सहसा शून्य ते 10 मि. मी असते.
2026 च्या संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात, अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, नागपूर, भंडारा असे 6 जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यात पावसाची शक्यता ही सरासरी पेक्षा म्हणजे 10 मिमी पेक्षा कमी असेल. म्हणजेच संपूर्ण महिना जवळपास पावसाविना कोरडा जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती नागपूर, भंडारा, जिल्ह्यात मात्र सरासरी इतक्या म्हणजे 10 मिमी किंवा त्या पेक्षा कमी इतक्या किरकोळ पावसाची शक्यता असल्याचे खुळे यांनी सांगितले.
यंदा फेब्रुवारीत उन्हाचा चटका
नाशिक व अहिल्यानगर हे दोन जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांत दिवसाचे कमाल तापमान दरवर्षीच्या फेब्रुवारी महिन्यांत जाणवणार्या कमाल तापमानापेक्षा, या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात अधिक असेल. यामुळे फेब्रुवारी महिन्यांत दुपारीही उन्हाचा चटका जाणवेल. त्यामुळे रब्बीच्या बागायती शेत पिकांनाही अधिक सिंचनाच्या आवर्तनाची गरज भासण्याची शक्यता आहे.



