संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner
संगमनेर सहकारी साखर कारखान्याने जाणीवपूर्वक सभासद मतदारांच्या शेअर्स रक्कम भरून न घेणे, तसेच मयत सभासदांच्या वारसांची नोंद न करणे आणि अकोले तालुक्यातील दोन हजार सभासदांना निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार नसल्याच्या तक्रारी मोठ्या स्वरुपात प्राप्त झाल्याने सहकार चळवळीतील तत्वाची होत असलेली पायमल्ली लक्षात घेवून यंदाची संचालक मंडळाची निवडणूक न लढविण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला असल्याची माहिती आ. अमोल खताळ, ज्येेष्ठ नेते बापूसाहेब गुळवे, वसंतराव गुंजाळ व संतोष रोहोम यांनी दिली आहे.
यासंदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, संगमनेर कारखान्याची निवडणूक लढवावी, असा आग्रह कार्यकर्त्यांचा होता. त्यासाठी गटांमध्ये बैठका होवून प्राथमिक तयारीही सुरू केली होती. तथापि मतदार यादीमध्ये असलेल्या त्रुटी अतिशय गंभीर आणि सहकारी संस्थांच्या कार्यप्रणालीला हरताळ फासण्यासारख्या असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच कारखान्याचे दोन हजार सभासद मयत आहेत. या मयत सभासदांच्या वारसांची कोणतीही नोंद कराखान्याने केलेली नाही. विशेष म्हणजे मयत सभासदांपैकी तीस टक्के सभासद हे आम्हाला मानणारे होते. सहकारी चळवळीत राजकारण नको ही आमची भूमिका आहे. मात्र कारखाना ज्यांच्या ताब्यात आहे, त्यांनी मतदार यादीबाबत सभासदांच्या मागणीचा कुठेही विचार केला नाही. हे सहकार चळवळी मध्ये अभिप्रेत नसल्याकडे या पत्रकात लक्ष वेधले आहे. मात्र सभासद मतदारांना न्याय मिळवून देण्यासाठी आमचे काम सुरूच राहाणार असून सभासद असलेल्या आमच्या कार्यकर्त्यांना कुठेही व्यक्तिगत त्रास आणि त्यांचे अर्थिक नुकसान होवू नये, हीच आमची भूमिका असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
आमच्याकडे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवारांची संख्या चांगली होती. मात्र उमेदवारांची नावे समोर येवू लागली, तसा दबावतंत्राचा आणि प्रलोभन दाखविण्याचे प्रकार सुरू झाले. जे सहकार चळवळीला बदनाम करणारे आहे. केवळ निवडणुकांसाठी निवडणूक करणे योग्य नाही. विधानसभा निवडणुकीत तालुक्यातील जनतेने दिलेला कौल विकासासाठी असून त्याचा आदर करून आम्ही काम सुरू केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अतिशय ताकदीने लढविण्याचा निर्धार करून तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध होण्याचा निर्धार मात्र कार्यकर्त्यांनी केला असल्याचे पत्रकात म्हटले आहे.