संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
संगमनेर भाग सहकारी साखर कारखाना हा सभासद अन् शेतकर्यांच्या मालकीचा होता. मात्र काहीजण जणुकाही हा कारखाना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, अशाप्रकारे कारभार करत आहे. त्यामुळे तो कारखाना पुन्हा शेतकरी व सभासदांचा मालकीचा करण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी यंदाची निवडणूक लढविणार असल्याची घोषणा आमदार अमोल खताळ यांनी ऊस उत्पादक सभासदांच्या बैठकीमध्ये जाहीर करत निवडणुकीचा बिगुल वाजविला.
या बैठकीस ज्येष्ठ नेते वसंत गुंजाळ, दादाभाऊ गुंजाळ, भाजप तालुकाध्यक्ष वैभव लांडगे, शेतकरी नेते संतोष रोहोम, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विठ्ठल घोरपडे, तालुकाप्रमुख रमेश काळे, भाजप सरचिटणीस रोहिदास साबळे, संघर्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अॅड. संग्राम जोंधळे, गोरक्ष कापकर, बापूसाहेब देशमुख आदींसह ऊस उत्पादक सभासद उपस्थित होते.
आमदार खताळ म्हणाले, हा साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकर्यांच्या मालकीचा होता. मात्र कारखान्यावर काहीजण मालकी हक्क गाजवत आहे. तो कारखाना पुन्हा ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासदांच्या ताब्यात द्यायचा आहे. त्यासाठी आता ही निवडणूक ऊस उत्पादक सभासदांनीच हातात घेतली आहे. या जोरावरच ही निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढविणार आहोत. ही निवडणूक नुसती लढवायची नाही तर जिंकायची सुद्धा आहे. त्यादृष्टीने आपण सर्वजण मतदार सभासदांपर्यंत पोहोचण्याचे काम करावे, असे आवाहन करत निवडणूक लढविणार्या इच्छुकांची संख्या मोठी आहे. अजून काही इच्छुक असतील त्यांची नावे लवकरात लवकर द्यावी, असे सांगितले.
विशेष म्हणजे या निवडणुकीच्या काळात कारखाना यंत्रणेचा गैरवापर होणार नाही, याकडे लक्ष ठेऊन निवडणूक पारदर्शी होईल, अशा सूचना प्रशासनाला देणार असल्याचे आ. खताळ म्हणाले. सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासद हेच उमेदवार राहणार आहे. महायुती म्हणून नाही तर शेतकरी सत्ता परिवर्तन पॅनल या बॅनरखाली निवडणूक लढवणार आहोत, असे ज्येष्ठ नेते वसंत गुंजाळ म्हणाले.