मुंबई | Mumbai
महायुती सरकारला शंभर दिवस होत असताना देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील एक राजीनामा आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता पुढचा नंबर कोणाचा अशी चर्चा सुरु झाली आहे. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गौप्यस्फोट करत येत्या ६ महिन्यात आणखी एक विकेट पडेल असा दावा केला आहे. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारमधील मंत्र्यावरही गंभीर आरोप केले आहेत. भाजपच्या मंत्र्याने माजी राष्ट्रपतींची जमीन लाटण्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.
सुप्रीय सुळे यांनी केलेल्या दाव्यावर बोलताना संजय राऊत यांनी सरकारमधील सात ते आठ मंत्र्यांनी महाराष्ट्राचे वातावरण खराब केल्याचे म्हटले. यावेळी राज्याचे पणन मंत्री व धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्यावर संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. राऊत म्हणाले, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अनेक पात्र आहेत, त्यांचे चेहरे समोर येत आहेत. मुंडे यांचा बळी गेला आहे. अजून अशा प्रकारचे काही लोक आहेत. त्यांचेही बळी येत्या सहा महिन्यात जातील.
काय म्हंटले संजय राऊत
राऊतांनी जयकुमार रावल यांच्यावर आरोप करताना म्हंटले आहे की, जयकुमार रावल यांनी रावल को ऑपरेटिव्ह बँकेमध्ये कोट्यवधि रुपयांचे घोटाळे करुन ठेवले आहेत. कुटुंबातले खोटे कर्जदार तयार करुन कोट्यवधी रुपये लाटले. हे प्रकरण मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवणार आहे. त्यांना मी विचारणार आहे की, तुम्ही तुमच्या आसपासच्या लोकांना जनतेचा पैसा लुटण्याचा परवाना दिला आहे का? जयकुमार रावल अत्यंत भ्रष्ट कारभार करणारे मंत्री आहेत,” असे संजय राऊतांनी म्हटले.
जयकुमार रावल यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची जमीन बळकावल्याचाही आरोप राऊत यांनी केला. ते म्हणाले की, ‘माजी राष्ट्रपतींची जमीन लाटण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. त्यावर आता हायकोर्टाने ताशेरे मारेले आहेत. असे सात ते आठ भ्रष्ट मंत्री सरकारमध्ये आहेत. त्यांनी महाराष्ट्राचे वातावरण खराब केले आहे. अशा मंत्र्यांचा बळी जाणार आहे. यांच्याबाबतचे पुरावे भाजपचे आमचे मित्र आम्हाला पुरवत असतात, असा गौप्यस्फोटही राऊतांनी यावेळी केला.
मंत्री जयकुमार रावल यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची २६ एकर जमीन हडप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. धुळे जिल्हा न्यायालयाने रावल कुटुंबाने माजी राष्ट्रपतींची जमीन त्यांना परत करण्याचे आदेश दिल्याचे देखील म्हटले जात आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची दोंडाईचा शिवारातील तब्बल २६ एकर जमीन हडप केल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला. जयकुमार रावल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची जमीन हडप केल्याचा आरोप अनिल गोटे यांनी केला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा