मुंबई | Mumbai
निम्म्या महाराष्ट्रावर अतिवृष्टीचे संकट कोसळले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेय. राज्य सरकारमधील मंत्री कालपासून पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त भागात दौऱ्यावर आहेत. मात्र, सरकारने जाहीर केलेली मदत पुरेशी नसून, यामुळे शेतकरीवर्ग नाराज आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार काल धाराशिव दौऱ्यावर होते. या दौऱ्यात तरूणाच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर अजित पवार भडकले. ‘सगळी सोंगं करता येतात, पैशांचं सौंग करता येत नाही’, असे पवार म्हणाले होते. या वक्तव्यावरून खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर संताप व्यक्त केला आहे.
लाडक्या बहिणीच्या आडून सरकार मदतीचा हात आखडता घेऊ शकत नाही, असे म्हणत राऊतांनी महायुतीच्या नेत्यांवर टीका केली. मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना भेट दिली. शेतात आणि गावात जाऊन नुकसानीचा आढावा घेतला. या दौऱ्यावर संजय राऊतांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी (ता. 25 सप्टेंबर) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारच्या पाहणी दौऱ्यावर सडकून टीका करत म्हटले की, मराठवाड्याच पाहणी दौरा भास आहे. गेले कधी पाहणी केली कधी? शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा आक्रोश एकूण घेतला कधी? 36 लाख शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. 36 लाख शेतकरी उध्वस्त झाले आहेत. मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यात काहीच राहील नाही. मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांनी काय पाहिले ? काय समजून घेतले ? असे प्रश्न राऊतांकडून उपस्थित करण्यात आले. तर, केवळ पाण्याच्या बॉटलवर फोटो लावून त्याला मदत केली असे म्हणता येत नाही. मदत ही गुप्त असली पाहिजे. मदतीचे आम्ही स्वागत करतो, कारण त्याची गरज आहे. पण, महाराष्ट्र सरकारने किंवा केंद्र सरकारने काय केले? कोणत पथक पाठवले? हे मुर्दाड शासन आहे, असे म्हणत राऊतांनी सरकारला घेरले.
अजित पवारांनी केलेल्या, ‘पैशाचं सोंग आणता येत नाही’, या वक्तव्यावरून राऊतांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, ‘पैशांचं सोंग आणता येत नाही, तर सरकार चालवू नका. यांच्या दरोडीखोरीमुळेच आज ही वेळ आली आहे’, असा घणाघात राऊतांनी केला.
महाराष्ट्रावर ही वेळ कोणी आणली? ज्या लाडक्या बहिणींना हे मदत करत आहेत, त्यांचे संसार वाहून गेले आहेत. पण आज असं बोलण्याची वेळ का आली आहे तर? यांनी केलेल्या दरोडेखोरीमुळे ही वेळ आली आहे. साधारण 10 लाख कोटींचे कर्ज या सरकारवर आहे. यांना कोणी कर्ज द्यायला तयार नाही. 65 हजार कोटी व्याज भरतात ही लोक. मराठवाड्याच्या जनतेवर आलेल्या संकटावर कसा मार्ग काढणार? केंद्र सरकार दमडी द्यायला तयार नाही, त्यामुळे ही लोक काय करणार? शेतकऱ्यांनी जगायचं कसं? असे सवालही यावेळी राऊतांकडून उपस्थित करण्यात आले आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




