मुंबई | Mumbai
जागतिक बाजारामध्ये (Global Market) झालेल्या पडझडीमुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाली आहे. तर सिलेंडरच्या किंमतीत आणखी ५० रुपयांची वाढ झाल्याने लाडक्या बहिणींचे बजेट पुन्हा कोलमडले आहे. या वाढत्या महागाईवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी आज माध्यमांशी बोलतांना केंद्र सरकारवर (Central Government) टीकास्त्र सोडले आहे.
यावेळी बोलतांना ते म्हणाले की, “एका बाजूला जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती खाली येत असतील तर त्याचा फायदा ग्राहकांना (Customers) मिळाला पाहिजे. जर तो मिळत नसेल तर भारतासारख्या देशामध्ये निर्मला सीतारामन महागाईमध्ये तेल ओतण्याचे काम करत आहेत. सिलेंडरमध्ये ५० रूपयांनी वाढ झाल्याने लाडक्या बहिणींचे बजेट परत कोलमडले आहे. माझं आवाहन आहे की, भाजप नेत्या स्मृती इराणी, कंगणा राणावत यांना आंदोलनासाठी आमंत्रित करत आहोत. आमच्या महिलांच्या आंदोलनाचे नेतृत्त्व करावं, महिलांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. जेव्हा युपीएचे राज्य होते, तेव्हा महागाईविरूद्ध महिलांचे नेतृत्त्व करत होत्या. रस्त्यावर सिलेंडर टाकून बसल्या होत्या, आता सिलेंडर आम्ही पुरवू तुम्ही फक्त रस्त्यावर बसायला या. अशा प्रकारचे आंदोलन शिवसेना करणार आहे”, असे म्हणत राऊतांनी वाढत्या महागाईवर टीका केली.
पुढे ते म्हणाले की, “ज्या हिशोबात जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती (Crude Oil Prices) घसरलेल्या आहेत. त्या पाहता भारतात पेट्रोल आणि डिझेल ५० रूपयांत स्थिर असायला पाहिजे. सिलेंडरच्या किमती ४०० रूपयांनी खाली यायला हव्यात. आम्हाला अर्थशास्त्र शिकवू नका अर्थशास्त्र आम्हालाही कळतं. या देशांमध्ये प्रत्येक बाबतीत सामान्य माणसांची लूट सुरू आहे. निवडणुका आल्या की एखादी लाडक्या बहिणींसारखी योजना आणायची चार महिने राबवायची आणि नंतर वाऱ्यावर सोडून द्यायची, असे प्रकार सुरू असल्याची टीकाही संजय राऊत यांनी केली.
तसेच “पुण्यातील (Pune) दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. या प्रकारावरून रुग्णालय प्रशासन आणि थेट राज्य सरकारवर टीका केली जात आहे. यावरही राऊत यांनी भाष्य करत भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “ज्याठिकाणी भाजपच्या विचारांचे लोक आहेत ते सर्वच राहू केतू आहेत. हे जे म्हणत आहेत राहू केतू वगैरे हे सगळे मोदी, शहा भाजपचे अंधभक्त आहेत. हे काही आम्हाला सांगायची गरज नाही. अंधभक्त हा धर्मांध असतो त्यांच्या डोक्याला राजकारणामुळे एक बधिरता आणली आणि त्यातून त्यांना राहू केतू दिसतात”, असे राऊत यांनी म्हटले.