नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला. यानंतर आता त्यांच्या विमान अपघातावर त्यांच्याच पक्षातील नेते अमोल मिटकरी यांनी शंका व्यक्त केली आहे. मान अपघातावेळी ‘तिथं धुकं नव्हतं तर धोका होता’, त्यामुळं अजित दादांचा 100 टक्के घात झाल्याचे ते म्हणाले. आता यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावरून गंभीर शंका उपस्थित केली आहे.
गोयल, पटेल, पारेख, शाह यांचा पक्ष होण्याची शक्यता
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. पियुष गोयल यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल झाल्याचा दावा केला. मात्र त्यानंतर काही वेळात त्यांनी आपल्या वक्तव्यावरील यु-टर्न घेतला. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, अजित दादांचा पक्ष हा आता पवार, पाटलांचा पक्ष राहिलेला नाही. तो आता गोयल, पटेल, पारेख, शाह, मोदी यांचा पक्ष होण्याची शक्यता आहे.
प्रादेशिक अस्मिता जपणारा पक्ष भारतीय जनता पक्षाने गिळून टाकला
अजित पवारांचा पक्ष हा अस्सल मराठमोळ्या चेहरांचा पक्ष होता. सुरुवातीला अजितदादांचा पक्ष हा शाहांचा पक्ष होता. आता तो पटेल यांचा पक्ष होईल आणि महाराष्ट्रातील एक प्रादेशिक अस्मिता जपणारा पक्ष भारतीय जनता पक्षाने गिळून टाकला आहे.
हे सर्व काही रहस्यमयी आहे
संजय राऊत पुढे म्हणाले, “अजित पवारांनी स्वगृही परतणे म्हणजे भाजपचा तो पराभव होता. देशातल्या राजकारणाला कलाटणी देणारा तो निर्णय ठरला असता. भाजपची जी दहशत आहे ती मोडली असती. अजित पवार वारंवार सांगत होते की माझ्याकडे भाजपच्या घोटाळ्याची फाईल आहे, ती मी उघड करेन. त्यांनी १५ जानेवारीला हे विधान केले होते. त्यानंतर, पुढच्या दहा दिवसांत विमान अपघातात त्यांचे निधन झाले. हे सर्व काही रहस्यमयी आहे. मी कोणावर आरोप करत नाही, पण या सर्व लोकांच्या मनातील शंका आहे,” असे म्हणत त्यांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत.
तेवढ्यापुरतेच अजितदादा भाजपला सरेंडर झाले
अजित पवार यांनी कधीही भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यावर काम केले नाही. सत्तेसाठी ते एकत्र आले. त्यांच्यावर भाजपने काही संकटं लादली. घोटाळ्याचे आरोप झाले, ईडी, सीबीआय मागे लावले. त्यामुळे इतर राजकारणी जसे करतात तसेच त्यांनी केले. तेवढ्यापुरतेच अजितदादा भारतीय जनता पक्षाला सरेंडर झाले. आपल्या वरच्या फाईल क्लिअर करून घेतल्या. त्यानंतर ते पुन्हा एकदा स्वगृही परतण्यासाठी धडपड करत होते. पण दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला, असे संजय राऊत यांनी म्हटले.
विलीनीकरणाची चर्चा होत असती तर अजितदादांनी आम्हाला सांगितले असते, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. यावर खासदार संजय राऊत म्हणाले की, “अजित पवारांनी फडणवीसांसोबत राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत चर्चा केली नसेल, याचा अर्थ त्यांचा फडणवीसांवर विश्वास नसेल. त्यांना स्वगृही जायचे असेल, तर फडणवीसांशी चर्चा करण्याची गरज काय? फडणवीसांचा पक्ष हा अखंड महाराष्ट्राच्या विरोधात, मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याच्या बाजून आहे. अशावेळी अजित पवारांसारखा नेता या भूमिकेवर काम करू शकणार नाही, हे आम्हाला माहीत आहे.” असे म्हणत निशाणा साधला.
“अजित पवारांनी आपल्याशी चर्चा का केली नाही? याचे देवेंद्र फडणवीसांनी आत्मचिंतन करावे. इतर शंभर लोक बोलत आहेत ते खोटे आणि फडणवीस बोलायत ते खरे, हे चुकीचे आहे. आज अजित पवार नाहीत, त्यामुळे त्यांच्या नावावर कोणतीही बिले फाडू नयेत,” असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




