नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
आज सकाळीच राज्याच्या राजकीय राजकारणात मोठी घडामोड पाहायला मिळाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले. दोन्ही नेत्यांमध्ये मुंबईतील नागरी समस्यांबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर महाराष्ट्र्र्राच्या राजकारणात वेगवेगळे अंदाज वर्तवले जाऊ लागले. राज ठाकरे भावावबरोबर जाणार की देवाबरोबर जाणार, याची चर्चा सुरू झाली होती. यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
सध्या गणपती उत्सव तोंडावर आहे. राज्यात घरोघरी गणपती येतात. कदाचित ते गणपतीचे आमंत्रण देण्यासाठी वर्षा निवासस्थानी गेले असतील, असा टोला खासदार संजय राऊतांनी लगावला. राज्यासंदर्भातील काही प्रश्न असतील. फडणवीस यांच्या काळात काल मुंबई बुडाली. दोन दिवसांपासून, मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे यासारखी शहरे बुडाली आहेत. त्यामध्ये कुणाला इतका त्रास करून घेण्याची गरज नाही, असा खोचक टोला त्यांनी लगावला. आम्हाला त्रास झालाय का तर नाही. आम्हाला माहिती आहे काय आहे ते, असे राऊत म्हणाले.
राज ठाकरेच भेटीबद्दल सांगू शकतील
राज्याच्या राजकारणात अनेक जण मुख्यमंत्र्यांना भेटतातच. पण त्यावर आताच चर्चा कशाला करायची. या भेटीबद्दल राज ठाकरेच अधिक सांगू शकतील. दोन मोठे नेते भेटत आहेत. एक राज्याचे मुख्यमंत्री आहेत. तर दुसरे राज ठाकरे हे आहेत. त्यांच्यात बंद दाराआड चर्चा सुरू असेल, असे तुम्ही म्हणताय. या भेटीत काय चर्चा झाली, कोणत्या विषयावर काय बोलणे झाले हे राज ठाकरे सांगतील. ते परखड नेते आहेत, असे संजय राऊत म्हणाले.
राज ठाकरे हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटले आहे आणि मुख्यमंत्र्यांना भेटणे हा काही राजकीय अपराध नाही, असे संजय राऊत म्हणाले. उद्या माझे काही काम असेल. उद्धव ठाकरे यांचे काही काम असेल तर मुख्यमंत्र्यांना भेटले पाहिजे. मुख्यमंत्री हा काही एका गटाचा मुख्यमंत्री नाही. तो राज्याचा मुख्यमंत्री असतो, असे संजय राऊत म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





