मुंबई । Mumbai
“उत्तर भारतीय ‘बटोगे तो कटोगे’ हे भाजप आणि शिंदे गटाचेच काम असून हिंदी भाषिकांना अस्वस्थ करण्याचे राजकारण तेच करत आहेत,” अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. मुंबईत लावण्यात आलेल्या पोस्टर्सवरून त्यांनी भाजप आणि मिंधे गटाला चांगलेच धारेवर धरले.
मराठी रिक्षावाल्यावरील हल्ल्यावरून भाजपला सवाल संजय राऊत यांनी यावेळी भाजप आमदार पराग शाह यांच्यावर गंभीर आरोप केले. “भाजप आमदार पराग शाह यांनी मुंबईत एका गरीब मराठी रिक्षावाल्याला मारहाण केली, हे कुणाला दिसत नाही का? भररस्त्यात मराठी माणसावर दादागिरी करण्याचा अधिकार भाजप आमदारांना दिला कोणी?” असा संतप्त सवाल राऊत यांनी विचारला. गरीब मराठी माणसाला मारणे हेच भाजपचे धोरण आहे का, असा टोलाही त्यांनी लगावला.
‘दिल्लीचे बूटचाटे’ म्हणत भाजपवर टीका भाजपच्या राजकारणावर टीका करताना राऊत यांची जीभ चांगलीच घसरली. “हे सर्व दिल्लीचे बूटचाटे लोक आहेत. त्यांनी त्यांचे राजकारण करावे, आम्हाला मार्गदर्शन करण्याची गरज नाही. दिल्लीचे बूट कसे पुसायचे किंवा चाटायचे याची त्यांची रंगीत तालीम सध्या सुरू आहे,” अशी बोचरी टीका त्यांनी केली. स्वाभिमान सोडून स्वतःचेच लोक राज्याविरुद्ध उभे राहत असल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला.
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने भाजपच्या पोटात गोळा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर भाष्य करताना राऊत म्हणाले की, “दोन ठाकरे बंधू एकत्र येत असल्यामुळे भाजपच्या पोटात भीतीचा गोळा आला आहे आणि तीच भीती त्यांच्या जिभेतून बाहेर पडत आहे.” आजचा दिवस महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी अत्यंत मंगलमय आणि प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. दोन्ही ठाकरे बंधू शिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद घेऊन एका ऐतिहासिक पर्वाची सुरुवात करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुंबईवर मराठी माणसाचाच पहिला हक्क मराठी ऐक्याचा ‘मंगल कलश’ आज संपूर्ण राज्याला पाहायला मिळेल, असे सांगतानाच “मुंबईवर मराठी माणसाचाच पहिला हक्क आहे आणि यापेक्षा वेगळा वचननामा असूच शकत नाही,” असे राऊत यांनी ठामपणे सांगितले. मराठी माणूस एक आहे आणि तो एकच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जागावाटपाचे सूत्र निश्चित आगामी निवडणुकांच्या जागावाटपाबाबत बोलताना संजय राऊत यांनी स्पष्ट केले की, “जो जिंकेल त्याची जागा” हे मेरिटवर आधारित आमचे धोरण आहे. शिवसेना आणि मनसेमध्ये हेच धोरण राबवले जाईल. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक आणि पुणे यांसारख्या महत्त्वाच्या महानगरपालिकांच्या जागावाटपाची चर्चा पूर्ण झाली असून, गुणवत्तेनुसारच जागांचे वाटप केले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.





