मुंबई | Mumbai
गेल्या काही दिवसांपासून राज्यात बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) आणि परभणी हिंसाचार (Parbhani Violence) प्रकरण चांगलेच गाजत आहे. या पार्श्वभूमीवर काल काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी परभणी येथे जाऊन सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryawanshi) यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यानंतर राहुल गांधींनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) लक्ष्य करत निशाणा साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत खोटी माहिती दिली, असा हल्लाबोल केला. यानंतर फडणवीस यांनी राहुल गांधी द्वेष पसरवण्यासाठीच परभणीत आले होते, असे प्रत्युत्तर दिले. त्यानंतर आज यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.
यावेळी बोलतांना राऊत म्हणाले की, “देशात लोकशाही (Democracy) आहे का, महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) बिहारपेक्षा परिस्थिती गंभीर आहे हे देवेंद्र फडणवीसांनी समजून घ्यावं. परभणी आणि बीडमधील घटना राज्याच्या प्रतिष्ठेला काळिमा फासणाऱ्या आहेत. भयंकर अपराधाशी संबंधित असलेले संशियत गुन्हेगार आपल्या मंत्रिमंडळात आहे. बीड आणि परभणीसंदर्भात ज्यांच्यावर लोकांचा संशय आणि रोष आहे अशी लोक मंत्रिमंडळात आहे. आपण त्यांना घेतलेले आहे, न्यायाच्या गोष्टी करता स्वत: एकदा बीडला जा, गृहमंत्री म्हणून गेलात का? मग राहुल गांधी परभणीला गेल्यावर आपलं पित्त का खवळले”, असा सवाल त्यांनी फडणवीस यांना केला.
पुढे राऊत म्हणाले की, ” राहुल गांधी (Rahul Gandhi) लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. भारतीय संविधानाने त्यांना दर्जा दिलेला आहे तो कॅबिनेट मंत्र्यांचा आहे. तो दर्जा नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी दिलेला नाही. जेव्हा हातात होते तेव्हा विरोधीपक्षनेते मिळू दिले नाही. मोदींना बहुमत नाही, ते कुबड्यांवर आहेत. परभणीला तुम्ही गेलात का, जरी गेलात तरी सैन्य घेऊन जाल. राहुल गांधी आले तर टीका करता, देशमुख कुटुंबाचा त्या माऊली आणि मुलांचा आक्रोश कानाचा पडदा फाटत नसेल तर राज्याचे मुख्यमंत्री (CM) म्हणून निर्दयी आहात. राहुल गांधींमुळे संतोष देशमुख हत्या प्रकरण देशपातळीवर गेली आणि तुमची बेअब्रू झाली. राहुल गांधी आले त्यांचे मी आभार मानतो”, असे म्हणत राऊतांनी भाजपवर निशाणा साधला.
तसेच छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्याने ते नाराज आहेत. यावर बोलतांना राऊत म्हणाले की, “ज्यांच्यावर लोकांचा संशय आहे ते आपल्या मंत्रिमंडळात आहेत. आपण मंत्रिमंडळातून छगन भुजबळ यांना दूर करू शकतात. पण एका हत्येचा संशय असणार्यांना तुम्ही मंत्रिमंडळापासून दूर ठेवत नाही. कारण तुमचे जातीचे राजकारण आहे. तुम्ही एक समाज वापरून घेत आहात. भुजबळांना काही आमदारांचा विरोध आहे म्हणून लांब ठेवल्याचं सांगता पण इथे जनतेचा विरोध आहे, बीडसह महाराष्ट्रातील जनतेचा विरोध आहे. संतोष देशमुख यांच्या खुनाच्या कारस्थानात ज्यांचा संशयास्पद हात आहे अशी व्यक्ती राज्याच्या मंत्रिमंडळात नको, अशा घोषणा अजित पवारांच्या समोर देण्यात आलेल्या आहेत” असा घणाघात संजय राऊत यांनी केला.