Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याMaratha Andolan : “महाराष्ट्रात तीन-तीन जनरल डायर, तो अदृश्य फोन कॉल…”; संजय...

Maratha Andolan : “महाराष्ट्रात तीन-तीन जनरल डायर, तो अदृश्य फोन कॉल…”; संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल

मुंबई | Mumbai

जालन्यात आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीहल्ला केल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद आता उमटू लागले आहेत. राजकीय वर्तुळातून या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं जात आहे. विरोधकांनी हे सर्व सरकारच्याच आदेशांनी घडवून आणण्यात आल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दोन दिवसांत निर्णय घेण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात सध्या तीन-तीन जनरल डायर आहेत, असं म्हणत त्यांनी शिंदे सरकारवर त्यांनी शाब्दिक हल्ला चढवला आहे. महाराष्ट्रात जनरल डायर कोण? हे महाराष्ट्रात सर्वांना समजलं आहे . महाराष्ट्रात जनरल डायरचं राज्य आहे. एक नाहीतर तीन-तीन जनरल डायर सध्या राज्यात आहेत. एक मुख्य जनरल डायर आणि दोन उप जनरल डायर. जनरल डायरच्या मानसिकतेने राज्यकारभार सुरु आहे. जे विरोधात जातील. त्यांच्यावरती हल्ले करा. त्यांना गोळ्या मारा असा कारभार सध्या सुरू आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

Maratha Andolan : मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक, मोठा निर्णय घेणार?

मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला करण्याचे आदेश देणारा फोन कुणी केला होता? असा प्रश्नही संजय राऊतांनी केला आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना तिथे जाण्याचं तोंड नाहीये. कारण त्यांनीच आंदोलन चिरडून टाकण्याचे आदेश दिलेत. अदृश्य फोन कुणाचा होता? मुख्यमंत्री की गृहमंत्र्यांच्या कार्यालयातून होता? लाठीहल्ल्यात पोलिसांचा दोष नाही. तिथल्या पोलीस प्रमुखांना सक्तीच्या रजेवर पाठवलं. तुम्ही यात पोलिसांचा बळी देताय. पण वरिष्ठांचा आदेश आल्याशिवाय पोलीस प्रमुख हा निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यांना वरून आदेश आले. आता हे वरून म्हणजे कुठून आले ही गोपनीयता पोलीस अधिकारी पाळतायत, असं राऊत म्हणाले.

Maratha Andolan : मराठा आंदोलनाचा भडका! सरपंचाने जाळली स्वत:ची कार, ‘एक मराठा, लाख मराठा’च्या दिल्या घोषणा

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, राज्यात जनरल डायरच्या मानसिकतेतूनच राज्य कारभार चालवला जात आहे. जालन्यात मराठा आरक्षणाकरिता सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी केलेला लाठीचार्ज हा दंडुकेशाहीचाच एक भाग आहे. जे-जे आपल्या विरोधात आहेत, त्यांना अमानुषपणे चिरडले जात आहे. तर भ्रष्टाचाराचे आरोप करूनही नंतर ज्यांना आपल्या पक्षात घेतले त्यांना आता गौरवले जात आहे. हसन मुश्रीफांमागे याच सरकारने ईडी लावली होती. आता ते त्यांना भारतरत्न, पद्मश्रीबी देतील, असा टोलाही संजय राऊतांनी लगावला.

- Advertisment -

ताज्या बातम्या