बीड | Beed
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सुनावणीला २० मार्च रोजी सुरुवात झाली असून आज या प्रकरणातील दुसरी सुनावणी कोर्टात पार पडली. यावेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हत्या प्रकरणात सुरुवातपासून नेमके काय घडले आणि कोणत्या आरोपीचा काय रोल आहे, याची माहिती कोर्टासमोर मांडली.
विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी न्यायालयासमोर संतोष देशमुख यांच्या हत्येचा घटनाक्रम मांडायला सुरवात केली. वाल्मिक कराडचा खंडणी प्रकरण आणि संतोष देशमुख खून प्रकरणाशी कशाप्रकारे संबंध आहे, हे उज्ज्वल निकम यांनी न्यायालयाला सांगितले.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी बीड जिल्हा न्यायाधीश व्यंकटेश पाटवदकर यांच्यासमोर सुरु झाली. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर सरकारी वकील उज्वल निकम यांचा युक्तीवाद सुरु झाला. युक्तीवादात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. पवनचक्की कंपनीला मागण्यात आलेली खंडणी आणि नंतर झालेली सरपंच संतोष देशमुख यांची हत्या या दोन घटनांचा कसा संबंध आहे, हेदेखील निकम यांनी माहिती देताना सांगितले आहे. उज्वल निकम यांनी ही केस चार्ज फ्रेम करण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. मात्र आरोपीच्या वकिलाने त्यांना कागदपत्रे न मिळाल्यामुळे चार्ज फ्रेम न करण्याची मागणी केली.
आरोपी विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये २९ तारखेला बैठक झाली होती. इथे सगळे आरोपी हजर होते. वाल्मीक कराड याने जगमित्र या त्याच्या कार्यालयात पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे खंडणी मागितली. त्यानंतर जेव्हा सरपंच संतोष देशमुख यांनी खंडणीला विरोध केला तेव्हा सुदर्शन घुले याने पवनचक्की कंपनीच्या वॉचमनला मारहाण केली. ८ डिसेंबर रोजी नांदूर फाटा येथील हॉटेल तिरंगावर वाल्मिक कराडसह विष्णू चाटे सुदर्शन घुले यांची बैठक झाली. यामध्ये संतोष घुले हा गँगचा लिडर हा होता. त्याला वाल्मिक कराडने मार्गदर्शन केले. संतोष देशमुख खंडणी प्रकरणात आडवे येत आहेत अशी चर्चा झाली. यावर ‘त्याला कायमचा धडा शिकवा’, असे विष्णू चाटे म्हणाल्याचा उल्लेख उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात केला. सीडीआरमधून फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे याने वाल्मीक कराड आणि विष्णू चाटे या दोघांना तीन वेळा फोन केला. हा सगळा तपशील मांडल्यानंतर संतोष देशमुख हत्याप्रकरणाची आजची सुनावणी संपली आहे.
संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. विष्णू चाटे, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना संतोष देशमुख यांचे अपहरण केले होते. त्यानंतर संतोष देशमुख यांना अनेक तास बेदम मारहाण करण्यात आली होती. संतोष देशमुख यांना मारहाण करण्यासाठी लोखंडी रॉड, फायटर आणि पाईपचा वापर करण्यात आला होता. बेदम मारहाण करण्यात आल्याने संतोष देशमुख यांच्या अंगातील रक्त साकळले होते. विष्णू चाटे आणि त्याच्या सहकाऱ्यांना त्यांच्या तोंडात लघवी केली होती. हा सगळा प्रकार सुरु असताना वाल्मिक कराड याला व्हिडिओ कॉल करण्यात आला होता. त्याच्या सांगण्यावरुनच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे.
दरम्यान, आता हे प्रकरण आरोप निश्चितीसाठी तयार असल्याचे उज्ज्वल निकम म्हणाले. मात्र कागदपत्रे न मिळाल्याने आरोप निश्चित करण्यात येऊ नये, अशी विनंती आरोपींच्या वकिलांनी केली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी १० एप्रिल रोजी होणार आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा