मुंबई | Mumbai
बीडमधील केज तालुक्यातील (Kej Taluka) मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. त्यात आता देशमुख हत्या प्रकरणात फरार असलेल्या आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून (Pune) अटक करण्यात आली आहे.या अटकेसोबत आज देशमुख हत्या प्रकरणावरून परभणीत सर्वपक्षीय मुक मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात सर्वपक्षीय नेत्यांनी भाषणं केली.मात्र, भाजप आमदार सुरेश धस (MLA Suresh Dhas) यांनी आजच्या मोर्च्याच्या भाषणात मंत्री धनंजय मुंडेंसह अजित पवारांवर निशाणा साधला. त्यामुळे त्यांचे भाषण चर्चेचा विषय ठरले.
यावेळी बोलतांना आमदार धस म्हणाले की, “जगात जर्मनी आणि देशात परभणी असं या परभणीचं नाव आहे. मी या परभणीचा १८ महिने पालकमंत्री राहिलो आहे. परभणी किती रगेल आहे, परभणीची रग मला चांगली माहिती आहे. या परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी हा कायद्याचा अभ्यास शिकणाऱ्या मुलाला कोबिंग ऑपरेशनमध्ये नेलं आणि त्याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला.प्रचंड मारहाण करून त्याचा मृत्यू झाल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांनी केला. विजय वाकोडे यांचाही मृत्यू झाला. कोबिंग ऑपरेशनची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत जाहीर केली. तर विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांना ५ लाख जाहीर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमनाथच्या कुटुंबीयांना वेळ देणार आहेत. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनाही वेळ देणार आहेत”, असे त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, “ज्या पद्धतीने यांनी संतोष देशमुखला मारले ती कोणती पद्धती आहे? छत्रपती संभाजीराजेंच्या हत्येप्रमाणेच ही हत्या झाली आहे. त्या लेकराने काय बिघडवले होते? फक्त एका दलित मुलाला वाचवायला गेला म्हणून असे करता? आकाच्या आकानेही जर संतोष देशमुखच्या हत्येचा व्हिडीओ पाहिला असेल तर ‘करलो जल्दी तयारी, हम निकले है जेलवारी.’ पण आज मी त्याबाबतीत बोलत नाही. ‘सौ चुहे खाके बिल्ली हज को चली’, तसं आकाचे आका आले आणि म्हणाले, ‘जे जे दोषी असतील त्यांना फाशी द्या.’ पण आधी नीट वागायचं असतं हे कोणी सांगायचं? आणि ‘अजितदादा, क्या हुआ तेरा वादा…?’ संदीप दिगुळेपासून संतोष देशमुखापर्यंत हत्येची बेरीज केली तर त्याचा मास्टरमाईंड कोण, कोणी हे उद्योग केले हे तुम्हाला माहीत नसेल तर परभणीला माणसं पाठवा, बारामतीची माणसं पाठवा. इतर समाजाला काय वागणूक मिळते, अठरा पगड जातीला काय वागणूक मिळते?”, असेही सुरेश धस यांनी म्हटले.
तसेच “मी अजितदादांना बोललो होतो, आमच्या पक्षाकडून संधी मिळत नाही तर प्रकाश सोळंकेला पालकमंत्री करा. नाहीतर राजेश विटेकरला करा. हे नसेल जमत तर बुलढाण्याचे कायंदे आमदार (MLA) आहेत, त्यांना करा. ते तर घड्याळाकडून जिंकून आले आहेत. तुमचं घड्याळ नसतं आलं. आम्हीही आलो नसतो. पण मागे बसलेले विभुती आहेत, त्यांनी पटांगण केलं म्हणून आपण येथे आहोत. नाहीतर सर्वांचा सुट्टा खेळ झाला असता”, असेही आमदार धस म्हणाले.