बीड | Beed
धनंजय मुंडे यांच्या मामी सारंगी महाजन यांनी आज मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर बोलताना त्या चांगल्याच भावुक झाल्या. आज मला त्यांच्याकडून बघून माझे जुने १६ वर्षांपूर्वीचे दिवस आठवले, जरी हे ग्रामीण भागात राहत असेल तरी त्यांचे आणि माझ दुःख एकच आहे. मी एकटी लढाई लढले आणि त्यांच्यासोबत त्यांचं गाव आहे हाच काय तो फरक आहे, असे यावेळी सारंगी महाजन यांनी म्हटले आहे.
काय म्हणाल्या सारंगी महाजन?
सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांच्या मागे धनंजय मुंडे हेच आहेत. त्यांनाही आत घाला, त्याला सरकारी जेवण जेऊ द्या, अशी मागणी थेट अजित पवारांकडे सारंगी महाजन यांनी केली आहे. सारंगी महाजन या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या मामी आहेत. कुटुंबातील व्यक्तीनेच धनंजय मुंड आणि पंकजा मुंडे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर दुसऱ्याच दिवशी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता. केवळ मंत्रीपदाचा नाही तर आमदारकीचाही राजीनामा दिला पाहिजे होता, असेही सारंगी महाजन यांनी म्हटले आहे.
सारंगी महाजन म्हणाल्या की, धनंजय मुडेंचे टोळभैरव बीडला बिहारसारखे खराब करत आहेत. वाल्मिक कराडला फक्त आत घातले. धनंजयलाही आत घाला. त्याला सरकारी जेवण जेऊ द्या, अशी मागणी त्यांनी अजित पवारांकडे केली. सारंगी महाजन म्हणाल्या की, अजित दादा धनंजय बद्दल योग्य निर्णय घेतील. मस्साजोगच्या घटनेनंतर त्याने नैतिकतेच्या आधारे स्वतः दुसऱ्या दिवशीच राजीनामा द्यायला पाहिजे होता. तो बीडचे नेतृत्व करतो. त्याने आमदारकीचाही राजीनामा द्यावा.
धनंजय मुंडेबद्दलची दहशत बीडच्या जनतेमध्ये आहे. त्याचे विमान फार उंचावर गेले आहे, ते बीडची जनताच खाली उतरवले. त्याला आत घेतले पाहिजे. त्याचे सर्व व्यवहार बाहेर काढावे. अशी मागणी सारंगी महाजन यांनी केली. मस्साजोगच्या घटनेमधील आरोपी वाल्मिक कराडवरुन महाजन यांनी धनंजय मुंडेंसह पंकजा मुंडे यांच्यावरही आरोप केले.
मला याची जाणीव आहे, मी ११ वर्षे समाजासोबत काम करते. ग्रामीण भागातील गरिबाचे काय दु:ख असते हे मला माहीत आहे. माझे दु:ख ही यापेक्षा वेगळे नाही. फरक एवढाच आहे की मी माझे दु:ख मागे टाकून मुलांना चांगले शिक्षण दिले. आज यांचे लहान लेकरे बघून मला खूप वाईट वाटते. यांच्याच्यासाठी मला काही करता आले तर मी नक्की करणार आहे, माझी जमीन आंबेजोगाईला आहे, तीची केस लढत आहे. त्या जमिनीतून मला त्यांना काही देता आले तर मी ते त्यांना नक्की देणार आहे, असे सारंगी महाजन यांनी म्हटले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा