मुंबई । Mumbai
गेल्या काही दिवसांपासून महापुरूषांबाबत बेताल वक्तव्ये करणाऱ्या विरोधात माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला आहे. सरकारकडे अशा लोकांची ‘नसबंदी’ करण्यासाठी कायदा करण्याची मागणी केली. बेताल वक्तव्ये करणाऱ्यांविरोधात कायदा याच अधिवेशनात आणून दहा वर्षांच्या शिक्षेचा कायदा करावा, अशी मागणी उदयनराजे यांनी केली. उदयनराजे यांनी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या विरोधात प्रशांत कोरटकरने केलेल्या वक्तव्यांवरून आज सातारमध्ये पत्रकार परिषद घेतली.
“छत्रपती शिवाजी महाराजांचा शासन मान्य अधिकृत इतिहास महाराष्ट्र शासनाने खंड स्वरुपात प्रसिद्ध करावा. त्यामुळे होणारे सारखे वादविवाद संपुष्टात येतील. कोणाला सिनेमा काढायचा असेल, सीरियल बनवायची असेल, सिनमॅटिक लिबर्टी म्हणतो, त्याच्यावर सुद्धा कायदा आला पाहिजे” अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केली. “कुठलीतरी कांदबरी काल्पनिक स्वरुपात लिहितात, अशी अनेक कुटुंब, घराणी या महाराष्ट्रात, देशात आहेत, ज्या लोकांनी आपलं आयुष्य वेचलय. काल्पनिक आधारावर जेव्हा तुम्ही चित्रपट रिलीज करता, हे करण्याआधी इतिहासकांची एक कमिटी बनवा” अशी मागणी उदयनराजे यांनी केली.
“चित्रपटाच स्क्रिप्ट त्या समितीसमोर गेलं पाहिजे. ती समिती अभ्यास करेल. काल्पनिक आधारावर जे होतं, त्यातून तेढ निर्माण होते. संपूर्ण शिर्के कुटुंबातले बरेच लोक आले होते. छावा चित्रपटात दाखवलय शिर्केंनी छत्रपती संभाजी महाराजांना पकडून दिलय. पण अशी इतिहासात कुठेही नोंद नाही. तसं असतं तर सोयरिक झाली असती का?” असं उदयनराजे म्हणाले. “ते म्हणत होते की, आज आम्ही कुठेही गेलो तरी लोक त्या नजरेने बघतात. आज लोक वेगवेगळ्या व्यवसायात, प्रोफेशनमध्ये असतील प्रत्येकावर गदा येते. त्यांच्याकडे बघण्याचा वेगळा दृष्टीकोन निर्माण होतो. समाजात तेढ निर्माण करण्याच काम हे जे लोक करतात, त्यासाठी याच अधिवेशनात कायदा आणा” अशी मागणी उदयनराजे यांनी केली. “मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता सर्वपक्षीय नेते यांनी याच अधिवेशनात कायदा पारित करुन दाखवावा. अन्यथा लोकांचा तुमच्यावरील विश्वास उडेल” असं उदयनराजे म्हणाले.
प्रशांत कोरटकरच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना उदयनराजे म्हणाले, “विकृत लोकांना कोणताही पक्ष किंवा जात नसते. अशा लोकांविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे,” असे सांगत त्यांनी भाजपचा बचावही केला. तसेच “कोणाकडे कोणतेही संरक्षण असले तरी एखाद्याची मानसिकता ‘मेलो तरी चालेल, पण याला खलास करणार’ अशी झाली, तर कोणही त्याला रोखू शकत नाही. त्यामुळे अशी वेळ येऊ देऊ नका,” असे उदयनराजेंनी असा इशाराही उदयनराजे यांनी दिला आहे. उदयनराजे भोसले यांनी औरंगजेबच्या समाधीच्या देखभालीवर होणाऱ्या खर्चावरही नाराजी व्यक्त केली. “औरंगजेब काही देव नव्हता, तो इथला नव्हता. शिवाजी महाराजांनी धर्मस्थळे वाचवली, पण औरंगजेबाने त्यांच्याविरोधात काम केले. मग त्याची समाधी जपायची काय गरज?” असा सवाल करत, “तो एक लुटारू आणि चोर होता,” असे स्पष्ट शब्दांत उदयनराजेंनी सांगितले.