Friday, May 3, 2024
Homeनगरशिष्यवृत्तीच्या रक्कमेत घसघशीत वाढ..!

शिष्यवृत्तीच्या रक्कमेत घसघशीत वाढ..!

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने उच्च प्राथमिक शाळा शिषवृत्ती (इयत्ता पाचवी) आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) साठी पात्र असणार्‍या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या रक्कमेत घसघशीत वाढण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता पाचवीच्या विद्यार्थ्यांना महिन्यांला 500 ते तर दहा महिन्यासाठी पाच हजार तर आठवीच्या विद्यार्थ्यांना महिन्यांला 750 आणि दहा महिन्यांसाठी 7 हजार 500 रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. पाचवीच्या विद्यार्थ्यांना पात्र ठरल्यानंतर सलग तीन वर्षे तर आठवीच्या विद्यार्थ्यांना सलग दोन वर्षे शिष्यवृत्ती देण्यात येते.

- Advertisement -

राज्यातील गुणवान विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तसेच स्पर्धात्मकतेसाठी प्रोत्साहीत करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्यावतीने दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्यात येते. राज्यातील शिष्यवृत्तीच्या परीक्षेला विशिष्ट शैक्षणिक दर्जा आहे. शिष्यवृत्ती मिळवणे ही विद्यार्थ्यांसाठी प्रतिष्ठेची बाब मानली जाते. राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील गुणवान विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी अधिकाअधिक प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने 1954 पासून राज्यातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. यापूर्वी नगरसह राज्यातील पाचवीच्या विद्यार्थ्यांना प्रति महिना 100 रुपये या प्रमाणे दहा महिन्यांसाठी एक हजार आणि तिन वर्षासाठी 3 हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येत होती. तर आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रति महिना 150 रुपये प्रमाणे दहा महिन्यांसाठी 1 हजार 500 रुपये आणि दोन वर्षासाठी 3 हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येत होती.

आता या रक्कमेत वाढ होवून पाचवीच्या विद्यार्थ्यांना दर महिन्याला 500 या प्रमाणे दहा महिन्यांसाठी पाच हजार रुपये, तर सलग तीन वर्षासाठी पाच हजार याप्रमाणे 15 हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. तर आठवीच्या विद्यार्थ्यांना दर महिन्यांला 750 रुपये याप्रमाणे दहा महिन्यांसाठी 7 हजार 500 रुपये याप्रमाणे दोन वर्षासाठी 15 हजार रुपयांचा शिष्यवृत्ती मिळणार आहे. शिष्यवृत्तीच्या रक्कमेत घसघशीत वाढ झाल्याने त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार असल्याचा विश्वास शिक्षण विभागाला आहे. या वाढलेल्या रक्कमेचा नगर जिल्ह्यातील पाचवीच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र अशा 677 विद्यार्थ्यांना तर आठवीच्या अंदाजे 669 पात्र विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या