अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
फेब्रुवारी 2023 मध्ये घेण्यात आलेल्या राज्य शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला नुकताच प्राप्त झाला आहे. या निकालात झेडपीच्या शाळेतील कोपरगाव तालुक्यातील संवत्सर शाळेतील स्वरूप संतोष गराडे हा (इयत्ता पाचवी) हा राज्यात सहाव्या तर श्रीगोंद्यातील घाडगेवस्ती शाळेतील सुयश संतोष ताठे (इयत्ता आठवी) हा राज्यात दहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. जिल्ह्यात इयत्ता पाचवीच्या 56 आणि इयत्ता आठवीच्या 2 अशा 58 प्राथमिक शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असल्याची माहिती जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात आली.
फेब्रुवारी 2023 मध्ये शिष्यवत्तीची परीक्षा झाली होती. त्याचा प्राथमिक निकाल हा मार्च 2023 मध्ये जाहीर झाला होता. या परीक्षेसाठी पूर्व उच्च माध्यमिक विभाग (इयत्ता पाचवी) मधून 33 हजार 585 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यातील 32 हजार 734 विद्यार्थ्यांनी परीक्षा देत 8 हजार 510 विद्यार्थी पात्र ठरले होते. परीक्षेसाठी 851 विद्यार्थ्यांनी दांडी मारली होती. तर 24 हजार 224 विद्यार्थी अपात्र ठरले होते. यात पाचवीचा निकाल हा 26 टक्के लागला होता. तर पूर्व माध्यमिक विभाग (इयत्ता आठवी) मधून 22 हजार 477 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यातील 22 हजार 52 विद्यार्थ्यांनी परीक्षा देत 3 हजार 720 विद्यार्थी पात्र ठरले होते. परीक्षेसाठी 425 विद्यार्थ्यांनी दांडी मारली होती. तर 18 हजार 332 विद्यार्थी अपात्र ठरले होते. यात पाचवीचा निकाल हा 16.87 टक्के लागला होता.
या परीक्षेसाठी झेडपीच्या 56 (पाचवी) आणि आठवीच्या 2 अशा 58 शाळांचा निकाल शंभर टक्के लागले आहे. यात 1 किंवा 1 पेक्षा जास्त विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही 278 असून शाळांची संख्या ही 124 आहे. यात सर्वाधिक शाळा या कोपरगाव तालुक्यातील 53 असून विद्यार्थी संख्या देखील कोपरगाव तालुक्यातील 125 आहे. तर राहाता तालुक्यातील एकाही शाळेचा यात समावेश नाही. नगर तालुक्यातील एका शाळेचा आणि एका विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात झेडपीच्या 256 आणि खासगीच्या 421 शाळा (इयत्ता पाचवी) मधील विद्यार्थ्यांचा जिल्हा गुणवत्ता यादीत समावेश आहे. तर आठवीच्या झेडपीच्या 22 आणि खासगीच्या 637 शाळांमधील विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. जिल्ह्यातील झेडपीच्या 278 शाळांमधील आणि खासगीच्या 1 हजार 58 शाळांमधील अशा एकूण 1 हजार 336 विद्यार्थ्यांचा समावेश शिष्यवृत्तीच्या जिल्हा गुणवत्ता यादीत समावेश झालेला आहे.
जिल्हा गुणवत्ता यादीतील विद्यार्थी
अकोले 18, संगमनेर 78, कोपरगाव 324, जामखेड 52, पाथर्डी 53, शेवगाव 52, कर्जत 69, पारनेर 149, नेवासा 37, श्रीरामपूर 142, राहाता 51, राहुरी 20, श्रीगोंदा 90, नगर 27 आणि मनपा 174 यांचा समावेश आहे.