अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
2024-25 या आर्थिक वर्षात जिल्ह्यात नव्याने मंजुरी दिलेल्या शाळा, अंगणवाड्यांच्या इमारत बांधकामासाठी जागा उपलब्ध न झाल्यास संबंधीत कामे रद्द करून ती अन्य ठिकाणी करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी मंजूर झालेल्या बांधकामासाठी प्रत्येक गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी आणि तालुका महिला बालकल्याण अधिकारी यांनी संबंधित गावात भेट देऊन इमारत बांधकामे मंजूर झालेल्या ठिकाणी जागा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावा. संबंधीत ठिकाणी जागा उपलब्ध न झाल्यास निधी खर्च करण्यासाठी अशी बांधकामे अन्य ठिकाणी हलवण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिला आहे.
मंगळवारी अहिल्यानगर तालुक्यातील अकोळनेर या ठिकाणी ग्रामविकास विभागाच्या वतीने बांधण्यात आलेल्या पंचायत राज प्रशिक्षण केंद्रात जिल्हा परिषदेचे खाते प्रमुख, गटविकास अधिकारी यांच्या समन्वय बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजीराव लांगोरे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
वर्षभराच्या खंडानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी जिल्हास्तरावर पहिल्यांदा अधिकार्यांची समन्वय बैठक घेतली. या बैठकीत येरेकर यांनी वेगवेगळे आदेश वजा सूचना केल्या आहेत. यात सेवानिवृत्त होणार्या अधिकार्यांना, कर्मचार्यांच्या त्याच्या सेवापूर्ततेच्या दिवशीच पेन्शनचा लाभ मंजूर करावा. जिल्ह्यात मान्सून पूर्व तयारी म्हणून प्रत्येक गावात पिण्ययाच्या पाणी नमुने तपासणी व्हावी. तसेच रेड कार्ड असणार्या ग्रामपंचायतमध्ये तात्काळ वेगवेगळ्या उपाययोजना राबवून संबंधित गावातील पाणी पिण्या योग्य कसे होईल यासाठी संबंधित विभागांनी एकत्रित प्रयत्न करावे.
पावसाळ्यात अकोले तालुक्यातील राजूरसारखी साथजन्य परिस्थिती निर्माण होणार याची दक्षता घ्यावी. 15 व्या वित्त आयोगाचा निधी खर्चाची टक्केवारी वाढवण्यासाठी ग्रामपंचायत विभागाने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना येरेकर यांनी दिल्या. तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जनावरांचे आवश्यक लाळ्या खुरकतसह अन्य रोगांचे लसीकरण पूर्ण करून घ्यावे अशा सुचन करत सर्व विभागाच्या योजनांचा आढावा घ्यावा.
घरकुलाच्या दुसर्या हप्त्यासाठी डेडलाईन
जिल्ह्यात घरकुल योजनेने चांगलाच वेग धरलेला आहे. जिल्ह्यात मंजूर घरकुल आणि कामे सुरू झालेल्या ठिकाणी संबंधीत लाभार्थी यांना पहिला हप्ता देण्यात आलेला आहे. त्यांची संख्या 72 हजार असून दुसर्या हप्ता देण्यात आलेल्यांची संख्या 24 हजार असून महिनाअखेरपर्यंत हा आकडा 40 हजारांच्या पुढे न्यावा. यासाठी डेडलाईन समजून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने घरकुलांची कामे पूर्ण करून घ्यावीत, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी दिल्या.