आपल्या अनोख्या अदा, डान्स आणि रोमँटिक अंदाज यामुळं तरुणींना घायाळ करणारे ज्येष्ठ अभिनेते शम्मी कपूर (Shammi Kapoor) यांचा आज जन्म दिवस.
शम्मी कपूर यांचा जन्म २१ ऑक्टोबर १९३१ रोजी मुंबईत झाला. तेव्हा त्याचे नामकरण शमशेर राज कपूर असे झाले. त्याकाळातील नाटक तसेच सिनेमाचे प्रसिद्ध कलावंत पृथ्वीराज कपूर यांच्या तीन मुलांपैकी शम्मी हे दुसरे अपत्य.
शम्मी कपूर यांनी अनेक विनोदी, खेळकर, तसेच रोमांचक प्रेमकथांवर आधारित चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका केल्या. १९६० च्या दशकात आपल्या आगळ्या नृत्यशैली, तसेच लकबी आणि दिमाखदार व्यक्तिमत्त्वासाठी शम्मी कपूर यांना बरेच जण भारताचा ‘एल्विस प्रिसली’ म्हणत.
शम्मी कपूर यांच्या अभिनयाची सुरूवात गंभीर भूमिकांपासूनच केली, पण फिल्मिस्तानच्या नासिर हुसेन दिग्दर्शित ‘तुमसा नही देखा’ आणि ‘दिल देके देखो’ ह्या चित्रपटांनंतर त्यांची एक खेळकर प्रतिमा तयार झाली. ‘जंगली’मुळे ही प्रतिमा वृद्धिंगत होत गेली आणि नंतरचे बहुतेक चित्रपट ह्याच धर्तीवर आधारित होते.
शम्मी कपूर हे आपले पार्श्वगायक म्हणून नेहमी मोहम्मद रफीची निवड करीत. मोहम्मद रफी आणि शम्मी कपूर अतिशय चांगले मित्र होते. आपल्या यशाचे श्रेय मोठ्या प्रमाणात मोहम्मद रफीकडे असल्याचे प्रांजळ मत शम्मी कपूर व्यक्त करत. विशेषत: ‘जंगली’मधील “याहू !!! चाहे कोई मुझे जंगली कहे” हे सिनेमात शम्मी कपूरच्या धुम-धडाका आणि माकडउड्यांनी तुफान लोकप्रिय झालेले गाणे रफींच्याच आवाजात आहे.
‘तीसरी मंजिल’च्या चित्रीकरणादरम्यान गीता बाली या पहिल्या पत्नीचे ‘देवी’च्या आजारामुळे निधन झाले आणि वैयक्तिक जीवनात शम्मीला आणि त्यांच्या दोन मुलांना एका खरोखरच्या शोकांतिकेचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांचे मुमताझ यांच्याबरोबर संबंध जुळले, पण तेही फार काळ टिकले नाहीत. पुढे १९६९ साली त्यांनी ‘नीला’ यांच्याबरोबर दुसरे लग्न केले.
दरम्यान शम्मी कपूर यांची ‘रोमँटिक हीरो’ची कारकीर्द १९७० च्या दशकात शरीराच्या वाढत्या स्थूलपणामुळे संपुष्टात आली. ‘अंदाज’ हा त्यांचा नायक म्हणून शेवटचा गाजलेला चित्रपट ठरला. ७० च्या दशकात ते यशस्वी चरित्र-अभिनेता म्हणून काम करू लागले. शम्मी कपूर यांनी ‘मनोरंजन’ आणि ‘बंडलबाज़’चे दिग्दर्शन केले. ‘मनोरंजन’मध्ये स्वतः चरित्र अभिनयही केला.
पुढे १९८० आणि १९९० च्या दशकांत त्यांनी चरित्र-कलाकार म्हणून काम सुरू ठेवले आणि ‘विधाता’ मधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट सहकलाकाराचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला. १९९० आणि २००० ह्या दशकांमधल्या कालावधीत हळूहळू त्यांनी चित्रपटांमधले काम कमी केले.
मूत्रपिंडांच्या विकारामुळं ७ ऑगस्ट २०११ रोजी शम्मी कपूर यांना मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलात दाखल करण्यात आलं होतं. १४ ऑगस्ट २०११ रोजी पहाटे ५ वाजता त्यांचं निधन झालं.