सोनई |वार्ताहर| Sonai
शनैश्वर देवस्थाने केलेल्या नोकर भरती विषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या चौकशीच्या आदेशामुळे मुंबई धर्मादाय कार्यालयात सुनावणी सुरू झालेली आहे. यात धर्मदाय आयुक्तांनी 25 जुलै ही तारीख दिली असून विश्वस्तांनी नोकरभरती विषयी म्हणणे सादर करण्याचे सांगण्यात आलेले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात शनैश्वर देवस्थानच्या विश्वस्तांनी केलेल्या नोकरभरती प्रकरणी पूर्ण लेखाजोखा मांडुन या प्रकरणी चौकशीचे लगेच आदेश दिले. दुसर्याच दिवशी मुंबई धर्मादाय कार्यालयाने शनैश्वर देवस्थानच्या विश्वस्तांना दिनांक 18 रोजी म्हणणे मांडण्यासाठी सांगितले. मुंबई येथील अॅड. समीर जाधव यांनी देवस्थानच्या विश्वस्तांच्या वतीने उपस्थित राहून प्रमाणित नकलांची मागणी केली यावर ही मागणी मान्य करून म्हणणे मांडण्यासाठी आठ दिवसांची म्हणजेच शुक्रवार 25 जुलै ही तारीख देण्यात आली.
विश्वस्तांकडुन याविषयी माहिती घेतली असता 23 जुलैपर्यंतही या प्रमाणित नकला मिळाल्या नसल्याचे समजते मग पुन्हा एका दिवसात या नकला मिळाल्या तरी त्याची माहिती घेऊन विश्वस्त व वकील म्हणणे सादर कसे करणार? यात शंका आहे व पुन्हा पुढील तारीख पडण्याची शक्यता जास्त वाटत असल्याचे जाणवते.
मुख्यमंत्र्यांनी विश्वस्तांची चौकशीचे आदेश दिल्यानंतर देवस्थान कार्यालयात व परिसरात मोजकेच विश्वस्त फिरकत असून अधिकारी व कर्मचारी फक्त आपल्या टेबलवरच काम करताना दिसत आहे.
नोकरभरती व बनावट अॅप संदर्भात काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अहिल्यानगर धर्मदाय कार्यालयाकडे अशाच प्रकारची चौकशी करण्याचा अर्ज केलेला आहे. त्यामुळे अहिल्यानगर कार्यालयानेही विश्वस्तांना नोटीस पाठवली आहे. विश्वस्तांच्या वतीने वकील म्हणणे सादर करणार असल्याचे समजते. एकाच प्रकारची माहिती मुंबई धर्मदाय व अहिल्यानगर धर्मदाय कार्यालयात सुनावणी चालणार असल्याने विश्वस्तांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.





