बारामती । Baramati
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली आणि अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. या दुःखद घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू झाली असून, अजितदादांनी निर्माण केलेल्या संस्थात्मक साम्राज्याचा वारसा कोणाकडे जाणार, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर बुधवारी बारामतीमधील विद्या प्रतिष्ठान संकुलात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार प्रामुख्याने उपस्थित होते, ज्यामुळे बारामतीच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
अजित पवार हे केवळ राजकारणातच नव्हे, तर सहकार आणि शिक्षण क्षेत्रातही अत्यंत प्रभावशाली व्यक्तिमत्व होते. त्यांच्याकडे माळेगाव साखर कारखान्याचे अध्यक्षपद, विद्या प्रतिष्ठानचे प्रमुख विश्वस्त पद, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्षपद आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्षपद अशा अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या होत्या.
तसेच ते रयत शिक्षण संस्थेचे संचालक आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे सदस्य म्हणूनही कार्यरत होते. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या पदांवर आता कोणाची वर्णी लागणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून विद्या प्रतिष्ठानमध्ये झालेल्या बैठकीत या विषयावर प्राथमिक चर्चा करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर आता महत्त्वाच्या आणि धोरणात्मक संस्थांची जबाबदारी देखील त्यांच्याकडे सोपवली जाऊ शकते. दुसरीकडे, तरुण नेतृत्वाला संधी देण्याच्या उद्देशाने पार्थ आणि जय पवार यांच्याकडे काही प्रमुख संस्थांची धुरा देण्याबाबत शरद पवार सकारात्मक असल्याचे समजते. या बैठकीत विश्वस्तांसोबत संस्थात्मक विषयांवर चर्चा झाल्यानंतर शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यात स्वतंत्र बैठकही पार पडली.
या स्वतंत्र चर्चेत केवळ संस्थात्मक पदेच नव्हे, तर भविष्यातील राजकीय समीकरणांवरही सविस्तर खल झाल्याचे बोलले जात आहे. अजित पवारांच्या निधनानंतर बदललेली राजकीय परिस्थिती आणि कुटुंबाची एकजूट टिकवून ठेवण्यासाठी शरद पवार यांनी स्वतः पुढाकार घेतल्याचे चित्र दिसत आहे. आगामी काळात संस्थात्मक पदांचे वाटप कसे होते आणि पवार कुटुंबातील ही नवी पिढी राजकारणात कशा प्रकारे सक्रिय होते, यावरच राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढील भवितव्य अवलंबून राहणार आहे.





