मुंबई । Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः फोन करून एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची विनंती केल्याचे पवारांनी सांगितले. मात्र, राधाकृष्णन यांच्या विचारसरणीशी आमचे पटत नसल्याने त्यांना पाठिंबा देणे शक्य नसल्याचे पवारांनी फडणवीसांना स्पष्ट केले.
पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी त्यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत पक्षाची भूमिका मांडली. “आम्ही बी. सुदर्शन यांना उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दिली आहे. आमची मते कमी असली, तरी आम्ही आमच्या तत्त्वांवर ठाम आहोत. कोणतेही चुकीचे उद्योग आम्ही करणार नाही,” असे पवारांनी ठामपणे सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आज पराभूत उमेदवारांची एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत मतचोरीसंदर्भात काही गंभीर माहिती समोर आली. याबाबत बोलताना पवारांनी निवडणूक आयोगावर तीव्र नाराजी व्यक्त केली. “निवडणूक आयोग स्वतंत्र असले, तरी त्यांनी आपले कर्तव्य नीट पार पाडले नाही. त्यामुळे आम्ही आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारणार आहोत,” असे त्यांनी जाहीर केले.
पवार पुढे म्हणाले, “निवडणूक आयोगाकडून आम्हाला कोणत्याही मोठ्या अपेक्षा नाहीत. तरीही, निवडणूक यादी आणि प्रक्रियेबाबत आमचा अभ्यास सुरू आहे. लवकरच याबाबत पुढील पावले उचलली जातील.” त्यांनी निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोपही केला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधून राधाकृष्णन यांना पाठिंबा मागितल्याचेही पवारांनी यावेळी नमूद केले. मात्र, आपली वैचारिक भूमिका आणि तत्त्वे यांच्याशी तडजोड करण्यास पवार यांनी स्पष्ट नकार दिला. “आम्ही आमच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहोत. मतांची संख्या कमी असली, तरी आम्ही लढत राहू,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.
या पत्रकार परिषदेत पवारांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना भविष्यातील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. निवडणूक आयोग याबाबत काय भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





