Friday, May 17, 2024
Homeमुख्य बातम्याNCP Crisis : "अजित पवारांची भूमिका..."; 'त्या' गौप्यस्फोटाबाबत शरद पवार स्पष्टच बोलले

NCP Crisis : “अजित पवारांची भूमिका…”; ‘त्या’ गौप्यस्फोटाबाबत शरद पवार स्पष्टच बोलले

पुणे | Pune

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) कर्जतमध्ये राष्ट्रवादीच्या (NCP) (अजित पवार गट) वैचारिक मंथन शिबिरात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना अनेक गौप्यस्फोट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला होता. त्याबाबत शरद पवारांकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नव्हती. यानंतर आज राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी पुण्यामध्ये (Pune) आमदार-खासदारांची बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत अजित पवार गटाने केलेल्या गौप्यस्फोटावर भाष्य केले…

- Advertisement -

यावेळी बोलतांना ते म्हणाले की, पक्षाचा अध्यक्ष मी होतो त्यामुळे प्रत्येकाला माझ्याशी सुसंवाद साधण्याचा पूर्ण अधिकार होता. ज्या मागण्या केल्या, त्याबाबत चर्चा झाली नाही असं मी म्हणत नाही. चर्चा झाली होती. पण ते जे विचार करत होते, ते आमच्या विचाराशी सुसंगत नव्हते. जनतेला आम्ही जी आश्वासने दिली होती त्या भूमिकेशी ते विसंगत होते. तसेच मी राजीनामा देण्याचं कारण काय होतं? मी पक्षाचा अध्यक्ष होतो. माझ्या राजीनाम्याचा (Resignation) निर्णय सामूहिक झाला होता, असे शरद पवार म्हणाले.

शरद पवार पुढे म्हणाले की, विधानसभेमध्ये आम्ही जी मते मागितली होती ती भाजपसोबत जाण्यासाठी मागितली नव्हती. ती विशिष्ट कार्यक्रमासाठी होती. भाजपच्या विरोधात आमची भूमिका होती. जे लोकं आमचे निवडून आले त्यांना मतदारांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांच्यासोबत गेलो असतो तर जनतेची दिशाभूल झाली असती. त्यांचे विचार जाहिरनाम्याशी विसंगत होते. त्यामुळे भाजपसोबत न जाण्याची भूमिका माझ्यासह अनेकांनी घेतली, असेही पवारांनी स्पष्ट केले.

पालकमंत्री भुसेंकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी; पिकांचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना

तसेच अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आपण लवकरच पुस्तक लिहून गौप्यस्फोट करणार असल्याचे म्हटले होते. त्यावर बोलतांना शरद पवार म्हणाले की, पटेलांच्या पुस्तकाची मी वाट बघत आहे. प्रफुल्ल पटेलांकडे पुस्तक लिहिण्यासाठी अनेक मुद्दे आहेत. पटेलांनी लोक पक्ष सोडून का जातात, यावर त्यांनी पुस्तक लिहावं. तसेच ईडीच्या कारवाईवरही त्यांनी पुस्तक लिहावे, असेही पवारांनी म्हटले.

पुढे शरद पवार म्हणाले की, सत्य काय आहे हे महत्त्वाचे आहे. अजित पवार खोटं बोलत आहेत. काही गोष्टी मला पहिल्यांदाच कळाल्या आहेत. लोक निर्णय घेतील तो स्वीकारायचा असतो. कोणी काही स्टेटमेंट करेल ते मी का स्वीकारावं? कोणी काय भूमिका घ्यावी हा त्यांचा अधिकार आहे. पण, त्यांनी हा निर्णय निवडणुकीच्या आधी घ्यायचा होता, असेही पवारांनी म्हटले.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Nashik Dindori Crime News : बापानेच दिली मुलाची सुपारी; पालखेड येथील खुनाचा उलगडा

- Advertisment -

ताज्या बातम्या