Friday, September 20, 2024
Homeब्रेकिंग न्यूज"राज ठाकरे यांनी दोन-तीनदा माझे नाव का घेतलं" ; शरद पवारांचा खोचक...

“राज ठाकरे यांनी दोन-तीनदा माझे नाव का घेतलं” ; शरद पवारांचा खोचक सवाल

पुणे | Pune
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आरक्षण आंदोलनावरून केलेल्या गंभीर आरोपांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन तीन वेळा माझं नाव का घेतलं, कळत नाही. महाराष्ट्राचा मणिपूर करण्यात किंवा जातीपातीच्या राजकारणात माझा हातभार असण्याचा प्रश्नच कुठे येतो? असा सवाल शरद पवारांनी विचारला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.

- Advertisement -

मराठा आंदोलक रमेश केरे पाटील यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षणावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी राज ठाकरेंवरही भाष्य केले. मी या रस्त्याने जात नाही. मला महाराष्ट्र ओळखतो. माझी पार्श्वभूमी अशी नाही, असे शरद पवार म्हणाले.

हे ही वाचा: मराठा आरक्षणावर शरद पवारांनी उचलले ठोस पाऊल; म्हणाले, आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा…

राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले शरद पवार?
“राज ठाकरे यांनी दोन-तीनदा माझे नाव का घेतलं, हे मला समजले नाही. पण मी या रस्त्याने कधी जात नाही. महाराष्ट्र मला थोडाफार ओळखतो. माझी पार्श्वभूमी अशी राहिलेली नाही. मीही मराठवाड्यात फिरत आहे, मलाही लोक अडवतात आणि निवेदन देतात. मग हेही मीच करत आहे का? मला आडवा आणि निवेदन द्या, हे मीच सांगतोय का?” असा प्रतिप्रश्न पवार यांनी राज ठाकरेंना उद्देशून केला.

राज ठाकरे काय म्हणाले?
माझा आणि मनोज जरांगेचा संबंध नाही. पण उद्धव ठाकरे आणि शरद पवार जरांगेच्या अडून राजकारण करत आहेत. जरांगे पाटलांच्या अडून विधानसभेचे राजकारण सुरू आहे. तुमचे राजकारण तुम्हाला लखलाभ… माझ्या नादी लागू नका… माझी पोर काय करतील हे सांगता येत नाही. उद्या माझे मोहळ उठले तर एकही सभा घेता येणार नाही. माझ्या वाट्याला जाऊ नका. तुमच्याकडे प्रस्थापित आहेत माझ्याकडे विस्थापीत आहेत, असे राज ठाकरे म्हणाले.

पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने मणिपूर होऊ नये म्हणून प्रयत्न करायचा तर हेच मणिपूर होईल म्हणत आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी यांना खासकरून मराठवाड्यात दंगली घडवायच्या आहेत. शरद पवारांचं राजकारण जाती-जातीत द्वेष निर्माण करणं हेच आहे आणि राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सुरू आहे. २००२ किंवा २००३ असेल मला आठवतंय मराठा आरक्षण हवं म्हणून मोर्चा आला होता.

जिथे व्यासपीठावर मोर्चा अडवला गेला तिकडे सर्वपक्षीय होते आणि तिथे सगळ्यांनी एकमुखाने सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे. मग गेल्या इतक्या वर्षात का नाही मिळालं ? मोदी ज्या शरद पवारांचं बोट धरून राजकारणात आले असे मोदीच सांगत आहेत, ते गेले १० वर्ष केंद्रात बहुमतात होते मग त्यांनी आरक्षण का नाही दिले? उद्धव ठाकरे केंद्रात आणि राज्यात ५ वर्ष नांदत होते मग तेव्हा त्यांनी मराठा आरक्षणाचा आग्रह का नाही धरला? जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या मागून यांचे विधानसभेचं राजकारण सुरु आहे,” असा आरोप राज यांनी केला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या