मुंबई | Mumbai
मध्य रेल्वेवरील (Central Railway)दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान आज (दि.९ जून) रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास अप आणि डाऊन फास्ट मार्गावरील दोन लोकल रेल्वे आजुबाजूच्या रेल्वे ट्रॅकवरुन जात असताना बाहेर लटकलेल्या प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागल्याने दहा हून अधिक प्रवासी चालत्या ट्रेनमधून (Train Accident) खाली ट्रॅकवर पडल्याने अपघात घडला. या अपघातात (Accident) चार जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत.
या अपघातानंतर मध्ये रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला (Swapnil Nila) यांनी पत्रकार परिषदेत अपघाताचे खापर अप्रत्यक्षपणे प्रवाशांवर फोडले. हा अपघात झाला तेव्हा अनेक रेल्वे प्रवासी फुटबोर्डवर उभे होते. गाडीत प्रचंड गर्दी होती, त्यामुळे प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागल्याने जवळपास १३ प्रवासी ट्रेनमधून खाली पडले. ट्रेनमध्ये भांडण झाल्यामुळे हा प्रकार घडला का, याची माहिती आम्ही घेत आहोत, असे नीला यांनी म्हणत दुर्घटनेचे खापर प्रवाशांवर फोडले होते. तसेच या प्रकरणानंतर रेल्वे प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टीका होत असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी या अपघातावर पोस्ट केली आहे.
मध्य रेल्वेच्या दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान ट्रेनमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. सर्व निष्पाप प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच, काही प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्याही प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी…
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 9, 2025
शरद पवारांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मध्य रेल्वेच्या (Central Railway) दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान ट्रेनमधून पडून प्रवाशांचा मृत्यू (Death) झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. सर्व निष्पाप प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच, काही प्रवाशांवर रुग्णालयात (Hospital) उपचार सुरु आहेत. त्यांच्याही प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो अशी प्रार्थना करतो, असे ते म्हणाले आहेत.
मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही
मध्य रेल्वेवर दररोज सरासरी ६ ते ७ प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू होतो. एका आकडेवारीनुसार समोर आलेली ही माहिती अत्यंत चिंताजनक आहे. लोकल ट्रेन्समधील वाढती गर्दी याचं मुख्य कारण असल्याचं सर्वज्ञात आहे. तरीही, असे अपघात घडल्यानंतर प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही.
घटनेची गांभीर्याने दखल घ्यायला हवी
केंद्रीय रेल्वे प्रशासनाने या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घ्यायला हवी. मध्य रेल्वेनेही वेळेचं उत्तम नियोजन करून त्यानुसार महत्वांच्या मार्गांवर लोकल फेऱ्या वाढवणं गरजेचं आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात. वारंवार होणाऱ्या अशा अपघातांना आळा घालण्यासाठी लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याच्या निर्णयाची विहित वेळेत अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे, असेही शरद पवारांनी म्हटले.