मुंबई । Mumbai
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. याबाबत दोन्ही नेत्यांनी सकारात्मक संकेत दिल्याने मनसे-ठाकरे गटाच्या युतीची शक्यता आहे.
मात्र या चर्चांदरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कुटुंबियांसह परदेशात गेले होते. काल (29 एप्रिल) राज ठाकरे परदेश दौऱ्यावरुन परतले आहेत. तर उद्धव ठाकरे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत परतणार असल्याची माहिती मिळत आहे. याचदरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर जेव्हा चर्चा सुरु झाली होती. त्यावेळी देखील शरद पवारांना ठाकरे बंधूंच्या युतीवर माध्यमांशी प्रश्न विचारला होता. मात्र त्यावेळी शरद पवारांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. आज पुन्हा शरद पवारांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावर माध्यमांशी प्रश्न विचारला. आज मात्र यावर शरद पवारांनी भाष्य केलं आहे.
एकत्र येत असतील तर चांगलंच आहे. मात्र यासंबंधीचं भाष्य करण्याचा आजचा प्रसंग नाही, असं शरद पवार म्हणाले. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आज आमदार जितेंद्र आव्हाडांनी पुढाकार घेत ठाण्यात प्रति तुळजाभवानी मंदीर उभारण्यात आले. आज या तुळजाभवानी मंदिरात प्राणप्रतिष्ठापनाचा सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्याला शरद पवार, पत्नी प्रतिभा पवार यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.
पहलगामवरचा हल्ला हा देशावरचा हल्ला आहे, यामध्ये ज्यांचे कुटुंबीय शहीद झाले, त्यांनी या देशासाठी किंमत दिलीय, इथे धर्म जात पात भाषा या गोष्टी आणायच्या नाहीत. आज भारतीयांवर हल्ला कुठल्या शक्तींचा होत असेल तर देशवासिय म्हणून कशाचीही अपेक्षा न करता आपल्याला एकत्र यावं लागेल. देशाचे पंतप्रधान आणि अन्य सहकारी याबाबत जी काही उपाययोजना करत असतील त्याला आमचं पूर्ण सहकार्य आहे, असं शरद पवारांनी सांगितले.