नाशिक । प्रतिनिधी Nashik
राज्य शासनातर्फे आयोजित ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन नाशिकमध्ये शनिवारी (दि.15) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले आहे. सकाळी 11 वाजता येथील गंगापूररोडवरील डोंगरे वसतिगृह मैदानावर हा कार्यक्रम होणार असून शासनपातळीवर सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...
पालकमंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी (दि.14) सायंकाळी कार्यक्रमस्थळी जाऊन तयारीचा आढावा घेतला. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळावा तसेच या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात या मूळ उद्देशाने हा उपक्रम राज्यभर राबवला जात आहे. या उपक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस व पवार राज्याच्या विविध भागात दौर्यावर आहेत.
90 स्टॉल्स
नाशिकमध्ये होणार्या कार्यक्रमासाठी 25 हजार लोक बसू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. याकरता 15 हजार स्क्वेअर फुटाचा मंडप उभारण्यात आला आहे. यावेळी नागरिक तसेच लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी शासनाच्या विविध विभागांचे माहितीपूर्ण 90 स्टॉल्स लावण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिली.
500 बसेसची व्यवस्था, वॉटरप्रूफ मंडप
लाभार्थ्यांना या कार्यक्रमस्थळी सहज पोहोचता यावे, यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या 450 बसेस, नाशिक शहरातील नागरिकांसाठी 150 सिटीलिंक बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने कार्यक्रमस्थळी वॉटरप्रूफ मंडपाची उभारणी करण्यात आली आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
मुख्य कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात संदीप थाटसिंगार यांच्यासह नऊ जणांचे पथक देशभक्तीपर गीत सादर करतील. स्वप्निल डुंबरे व त्यांचे सहकलाकार पोवाडा सादर करतील. पंढरपूर येथील चंदाबाई तिवाडी हे भारुडातून शासकीय योजनांबाबत माहिती देतील. कार्यक्रमाचे नियोजन तहसीलदार रचना पवार करत आहेत.
पोलिसांकडून वस्तूंवर निर्बंध
‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी येणार्या नागरिकांची मुख्य प्रवेशद्वारावर कडक तपासणी होणार असून आतमध्ये प्रवेश करणार्या नागरिकांना आपल्या सोबत आणलेल्या कोणत्याही वस्तू जसे सॅकबॅग, पिशवी, जेवणाचे साहित्य, पाण्याची बाटली, प्लास्टिक व काचेच्या वस्तू यांसारख्या वस्तूंना आतमध्ये नेण्यास पोलिसांनी पूर्णत: बंदी घातली आहे. नागरिकांनी आपल्या सोबत आणलेल्या वस्तू या आपल्या सोयीने ठेवून नंतरच कार्यक्रमासाठी यावे, असे आवाहन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केले आहे.
शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या ठिकाणी नाशिक शहर पोलिसांच्या वतीने चोख नियोजन करण्यात आले आहे, तर सर्वत्र कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शासनामार्फत राबवण्यात येणार्या अनेक कल्याणकारी योजनांचा सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही अडथळ्याविना लाभ मिळावा या हेतूने संपूर्ण महाराष्ट्रात शासनामार्फत शासन आपल्या दारी उपक्रम हाती घेण्यात आला आहे.