शिरसगाव |वार्ताहर| Shirasgav
श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव येथील माधव पवार वस्ती व परिसरात वारंवार बिबट्या व त्याचे बछड्याचे वास्तव्य दिसत असून अनेकदा लोकप्रतिनिधी व वनखात्याचे अधिकारी कर्मचारी यांना कळविले तरी याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार तेथील रहिवासी रवींद्र पवार यांनी केली.
शुक्रवारी रात्री 10.30 वाजता शिरसगाव येथील माधव बळवंत पवार यांच्या वस्तीवर एका कालवडीवर बिबट्याचे हल्ला करून जखमी केले आहे. दिवसाआड हल्ले होत आहे. वनखात्याने तेथे पिंजरा लावावा, अशी मागणी असताना पिंजरा लावला जात नाही. या भागात वर्ष-दोन वर्षांपासून बिबट्याची दहशत आहे. आता शाळा सुरू झाल्या आहेत,
शेतकरी शेतात जायला घाबरतात, कामगारांना कामावर जाण्यास भीती वाटते, पहाटे कामावर जायचे तर भीतीने काम सोडावे लागते. एखाद्या आंब्याखाली बिबट्या बसलेला दिसतो. वनखात्याचे याकडे दुर्लक्ष होत असून शिरसगाव हद्दीतच असलेल्या प्रगतीनगर येथील वनखात्याच्या कर्मचारी यांना कळविले तरी गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. एखाद्या माणसाचा जीव गेल्यावर वनखात्याला जाग येईल का? असा संतप्त सवाल करून हलगर्जीपणा करणार्या कर्मचार्याला निलंबित करावे, अशी मागणी होत आहे.