शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi
पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेअंतर्गत विनातारण देण्यात येणार्या दहा हजार रुपयांच्या कर्जासाठी शिर्डी नगरपंचायतमध्ये शहरातील फेरीवाले,
विक्रेते यांचे सुमारे एक हजार अर्ज प्राप्त झाले असून सदरचे अर्ज पडताळणी नंतरच अर्जदारास शिफारस पत्र देण्यात येणार असल्याची माहिती नगरपंचायतीच्या अधिकार्यांनी दिली.दरम्यान शिर्डी शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर पथविक्रेत्यांची संख्या आहे का? असा प्रश्न अधिकार्यांना पडला आहे.
कोव्हिड-19 पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे शिर्डी शहरात अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यावरील सर्वसामान्य पथविक्रेते, फेरीवाले यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या सर्वसामान्य व्यावसायिकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार पुरस्कृत पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी योजना सुरू केली आहे.
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी काल बुधवारपर्यंत शिर्डी शहरातील सुमारे एक हजार अर्ज प्राप्त झाल्याची माहिती नगरपंचायतीच्या अधिकार्यांनी दिली. यामध्ये फेरीवाला, केळेवाला, पत्र विक्रेता आदींसह सेवा उद्योग देणार्या व्यावसायिकांना राष्ट्रीयीकृत बँकांच्या माध्यमातून दहा हजार रुपये विनातारण कर्ज मिळणार आहे.
अर्जधारकांनी सदरचे अर्जाची पोहच महा ई सेवा केंद्र याठिकाणावरून ऑनलाईन पध्दतीने पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानंतरच त्यांना नगरपंचायतमधून ऑनलाईन शिफारसपत्र मिळणार आहे. ही प्रक्रिया इतर कर्जाप्रमाणेच आहे.
मात्र शहरातून एवढ्या मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाल्याने शहरात एवढी मोठी पथविक्रेत्यांची संख्या आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामध्ये अनेकांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. यामध्ये भाज्या, फळे, खाद्य पदार्थ, चहा, चप्पल ,पुस्तके ,स्टेशनरी, केशकर्तन ,दुकाने आदी व्यावसायिकांना देखील या योजनेचा लाभ घेता येईल.