नाशिक | Nashik
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) आज नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी ठक्कर डोम येथे सुरु असलेल्या कृषीथाॅनच्या (Krishithan) बक्षीस वितरण सोहळ्याला हजेरी लावली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी भाजप, शिंदे गटासह आमदार नितेश राणे व निलेश राणे यांच्यावर निशाणा साधत विविध राजकीय घडामोडीवर भाष्य केले.
नाशिकमध्ये येत्या १६, १७, १८, डिसेंबर या तीन दिवसांमध्ये नाशिक, मालेगाव, नांदगाव या भागामध्ये महाप्रबोधनच्या (Mahaprabodhan) सभा घेणार असून त्यावेळी विविध नेत्यांच्या भेटी घेईल. त्यात प्रामुख्याने आमचा सुहास कांदे, हेमंत गोडसे व दादा भुसे या सगळ्या भावांना मी विस्ताराने भेटायला येणार आहे. त्यांच्याशी माझं भांडण नाही मी आरोप करत नाही मी टीका करत नाही परंतु, जर एक कुटुंब आहे तर त्यात काय केलं, काय नाही केलं आणि काय चुकलं हे विचारण्याचा अधिकार मोठी बहिण या नात्याने मला आहे. मात्र भाऊ कसे उत्तर देतात आणि भाऊ किती उर्मट झाले ते माध्यम बघत आहेत. भावांचे संस्कार किती बिघडून गेले हे पण आपण पाहत आहोत, असेही त्या म्हणाल्या.
तसेच एकेकाळी शिवरायांचा बाळासाहेबांचा वारसा सांगणारे आमचे भाऊ आता कशा पद्धतीने भाजपच्या (BJP) वळचणीला गेल्यानंतर त्यांचा मनुवादी आणि संघवादी ‘यूएसपी’ उफाळून आलेला असून महिलांना हीन लेखण्याचा जो भाजपचा दृष्टिकोन आहे तोच यांच्या अंगात कसा भिनला तेही मला जाणून घ्यायचे आहे. कारण ज्या पद्धतीने गुलाब पाटलांचा ‘माज’ असेल अब्दुल सत्तारांची अत्यंत पातळी सोडलेली भाषा असेल या सगळ्या भावांची भाषा बदलली आहे ते मला कसे उत्तर देतात हे पहायचे असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे त्या म्हणाल्या की, किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांना अनेक कागदपत्रे काढूनही काहीच हाती लागत नाही. त्यामुळे त्यांना एखादं मंत्रीपद दिल्यास ते शांत राहतील असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला. तर आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांच्यावर टीका करतांना त्या म्हणाल्या, आपला नीतू आणि नीलू प्रचंड अगाऊ झाले आहेत. नारायण राणे (Narayan Rane) यांनी त्यांना चांगले संस्कार दिलेले दिसत नाही.माझा जुना व्हिडिओ व्हायरल करून ते काय सांगू पाहत आहेत हे समजत नाही.आरोप करण्यासाठी त्यांना विचारांचं खंडन मंडन करावं लागतं. प्रत्यक्षात त्यांचा अभ्यास कमी आहे.मी नुकताच त्यांचा कणकवलीत जाऊन होमवर्क घेतल्याने ते अस्वस्थ झाले असल्याचे अंधारे म्हणाल्या.
तर एका प्रश्नाला उत्तर देतांना उपमुख्यमंत्री व गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कुचकामी असल्याचा आरोप त्यांनी केला. त्या म्हणाल्या की, नाशिक शहरात सातत्याने अत्याचार वाढत आहेत. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे सपशेल दुर्लक्ष असून ते गृहमंत्री म्हणून कुचकामी ठरले आहेत. महत्वाचे खाते फडणवीस यांच्याकडे आहे, याचा अर्थ भाजपच्या इतर लोकांना अक्कल नाही का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. .
तसेच एकीकडे महिलांना फक्त धक्का लागल्याने गुन्हा दाखल होतो.मात्र काही लोक महिलांचा अपमान करूनही गुन्हा दाखल होत नाही ही शोकांतिका असल्याचे त्यांनी सांगितले. रामदेव बाबा (Ramdev Baba) यांच्यासोबत खुद्द फडणवीसांच्या पत्नी अमृता वहिनी उपस्थित होत्या. रामदेव बाबांच्या घाणेरड्या वक्तव्यावर त्या काहीही बोलल्या नाही हे दुर्दैव आहे. त्याजागी मी असते तर तिथेच खडसावले असते, असेही त्यांनी ठणकावले.
भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्या भूमिकेवर बोलतांना त्या म्हणाल्या की, एकेकाळी चपला मारण्याची भाषा करणाऱ्या आज गळाभेट घेण्यात धन्यता मानत आहेत. त्यांनी फक्त स्वतःच्या राजकीय आकांक्षेसाठी पूजा चव्हाण हीचा विषय उचलून धरला होता का असा प्रश्न पडतो कारण आता तो बंद केला आहे. या विषयावरून ज्या क्षणी त्यांना भाजपचा राजीनामा देण्याची वेळ येईल तेव्हा मी बहीण म्हणून उभी राहील असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे प्रचंड खोटं बोलतात त्यांचं इमान कोणत्याच पक्षासोबत नाही. त्यांनी स्वतःच्या मतदारसंघात असंस्कृतपणाचा कळस गाठल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्यावर बोलतांना त्या म्हणाल्या, राज्यपाल हे भाजपचे पूर्णवेळ कार्यकर्ते असून त्यांनी शासकीय पदापेक्षा पक्षाचेच काम पूर्ण वेळ करावे असा सल्लाही अंधारे यांनी दिला.