नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या बैठकीसह आघाडीतील विविध भेटीगाठी करण्यासाठी दिल्लीमध्ये पोहोचले आहेत. त्यांच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची निवासस्थानी भेट घेतली. आज दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवरती भाष्य केले आहे.
युतीचा निर्णय घ्यायला आम्ही भाऊ सक्षम
यावेळी बोलताना राज ठाकरेंसोबत युतीबाबतच्या प्रश्नावर उद्धव यांनी ‘युतीचा निर्णय घ्यायला आम्ही दोन्ही भाऊ सक्षम आहोत, त्यासाठी तिसऱ्याची आवश्यकता नाही,’ अशा शब्दात आपले मत व्यक्त केले. त्यांच्या या मतानंतर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना आणि मनसे एकत्र येणार असल्याच्या शक्यतांना आणखी बळ मिळाले आहे. त्याचसोबत, इंडिया आघाडीबाबत कोणत्याही अटी शर्थी नाहीत, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे हे तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज ते इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांसोबत उद्धव ठाकरे यांची बैठक होईल. त्यानंतर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे स्नेहभोजनाचे निमंत्रण असल्याने ठाकरे कुटुंबीय जेवणासाठी गांधींच्या निवासस्थानी जाणार आहे. या इंडिया आघाडीच्या बैठकीसोबतच शिवसेना ठाकरे गटाच्या पक्षाच्या खासदारांची सुद्धा उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यामध्ये बैठक घेणार आहेत.
एकनाथ शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरे यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवारीवर जोरदार टीका केली. ‘एकनाथ शिंदे त्यांच्या मालकाला भेटायला आले असतील. शिंदे मालकांना भेटत असतील तर आक्षेप नाही. यावर मी काय बोलणार. गद्दार गद्दार असतो. गद्दाराच्या मताला मी किंमत देत नाही.’ अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी शिंदेवर खोचक टीका केली.
चीन दौऱ्यावरुन ठाकरेंची टीका
मोदींच्या आगामी चीन दौऱ्यावरही ठाकरेंनी टीका केली. गलवान संघर्षानंतर देशात चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकला गेला. चीनविरोधाबाबत मोहिम उघडली गेली. आणि आत्ता त्याच चीनला मोदी भेट देत आहेत. चीन हा पाकिस्तानचा मित्र आहे. चीनचा दौरा हा मोदींच्या उद्योगपती मित्रांसाठी आहे का? असा सवाल ठाकरेंनी केला.
उपराष्ट्रपतींना तडकाफडकी का काढण्यात आलं?
याच अनुषंगाने आणखी एक प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी या संदर्भात मुंबईत चर्चा करु म्हणाले. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मोदींच्या परराष्ट्र धोरणांवरून हल्लाबोल केला. उपराष्ट्रपती निवडणुकीवरूनही उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला. ते म्हणाले की उपराष्ट्रपतींना तडकाफडकी का काढण्यात आले? ते सध्या आहे तरी कुठे याची पहिल्यांदा चर्चा झाली पाहिजे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. आज राहुल गांधी यांच्याकडून स्नेहभोजनासाठी निमंत्रण असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





