मुंबई | Mumbai
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांचे आगामी पुस्तक ‘नरकातला स्वर्ग’चे प्रकाशन शनिवारी होणार आहे. या पुस्तकात अनेक धक्कादायक दावे-प्रतिदावे करण्यात आले आहेत. गुजरातमध्ये गोधरा दंगलीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर चौकशीचा कडेकोट ससेमिरा सुरू असताना, त्यांना केंद्रातील यूपीए सरकारपासून वाचवण्यात शरद पवारांची निर्णायक भूमिका होती, अमित शाह यांना वाचवण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी केलेला एक फोन किती मदतगार ठरला, असा दावा खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या नव्या पुस्तकात केला आहे. या पुस्तकातील खुलास्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
शरद पवारांची निर्णायक भुमिका
नरेंद्र मोदी हे गुजरात दंगलीप्रकरणी एक आरोपी होते. तसेच अमित शाह हे एका खूनप्रकरणी आरोपी होते, त्यावेळेस युपीएचे सरकार होते. मोदींना दंगलीप्रकरणी अटक करण्यापर्यंतची परिस्थिती होती. पण त्यावेळी शरद पवार यांनी एका कॅबिनेटमध्ये मत मांडले की राजकीय मतभेद असतील, तरीही लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक करणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका पवारांनी मांडली होती. त्यांच्या या भूमिकेला काही सहकाऱ्यांनी मूकसंमती दर्शवली आणि त्यामुळे मोदींची त्यावेळी होणारी अटक टळली, असा खळबळजनक गौप्यस्फोट राऊतांनी या पुस्तकात केला आहे.
गुजरातमधील गोधराकांडानंतर मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन गृह राज्यमंत्री अमित शहा पुरते फसले होते. सीबीआयने विविध चौकशीला सुरूवात केली. तपासानंतर अमित शाह यांना तुरुंगवासाला सामोरे जावे लागले असते. परिस्थिती इतकी गंभीर होती की, तपासाची दिशा थेट मुख्यमंत्री नरेंद्र मोदींकडे वळू लागली होती. मोदींना अटक होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
एकच माणूस मदत करु शकतो ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे
अमित शाह गुजरातच्या दंगलीनंतर प्रचंड अडचणीत होते. केंद्रात यूपीएचे सरकार होते आणि दंगलीतील काही निर्घृण गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे सोपवला होता. यावेळी नरेंद्र मोदी यांना अमित शाह यांना मदत करता येत नव्हती. अमित शाह गुजरातमधून तडीपार होतेच. सीबीआयने फास आवळल्याने अमित शाह यांच्या तात्पुरत्या जामीनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अडचणीत अडकलेल्या अमित शहा यांना एकच माणूस मदत करू शकतो ते म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असे शाह यांना कोणीतरी सुचवले.
एके दिवशी भर दुपारी ते लहान जय शाह यांना घेऊन मुंबई विमानतळ उतरले आणि विमानतळावरून काळी पिवळी टॅक्सी पकडून ते बांद्राच्या दिशेने निघाले. मात्र मातोश्रीच्या आणि कलानगर परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाल्याने कलानगरचे मुख्य गेटवरच अमित शाह यांना अडवून ठेवण्यात आले. कारण त्यावेळी मातोश्रीची सुरक्षा व्यवस्था अनेक अडथळ्यांची होती. अमित शाह घामाघूम होऊन बराच काळ प्रतीक्षेत होते. दुसऱ्या दिवशी अमित शाह पुन्हा एकदा मातोश्रीवर आले. यावेळी शिवसेनाप्रमुखांनी त्यांना संध्याकाळची वेळ दिली आणि अमित शाह हे मातोश्रीवर गेले.
आप बात करेंगे तो न्यायमुर्ती आपकी बात मान लेंगे
गुजरात दंगलीत हिंदुत्वासाठी केलेल्या कामाची शिक्षा आपण व आपले कुटुंब भोगत असल्याची दर्दभरी कहाणी शिवसेनाप्रमुखांना सांगितली , “मी अडचणीत आहे, केस न्यायालयात सुरू आहे, तडीपार आहे…आप बात करेंगे तो न्यायमुर्ती आपकी बात मान लेंगे..तुमचा शब्द ते खाली पडू देणार नाही.’ असे अमित शहा बाळासाहेब ठाकरेंना म्हणाले. शहांनी केलेल्या विनंतीनंतर बाळासाहेब ठाकरेंनी तत्कालीन नेते मनोहर जोशी यांच्या फोनवरून संबंधित न्यायमूर्तींशी संपर्क साधला. बोलताना त्यांनी एकच वाक्य ठामपणे सांगितले, ‘तुम्ही कोणत्याही पदावर असलात तरी तुम्ही हिंदू आहात, हे विसरू नका.’ बाळासाहेबांच्या एका फोनमुळे अमित शहा यांच्या राजकीय प्रवासातील अडचणी दूर झाल्या, असे पुस्तकात नमूद करण्यात आल्या आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा