मुंबई | Mumbai
आगामी महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी तीव्र होत असल्याचे पाहायला मिळत आहे. लवकरच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लिहिलेल्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचे प्रकाशन केले. आता संजय राऊत यांनी या पुस्तकाची प्रत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना दिली आहे. सोबतच मोहन भागवत यांना पत्र ही लिहीले आहे.
‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाला मोठी मागणी असल्याचे खासदार संजय राऊत यांनी अलीकडेच सांगितले होते. ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाच्या तीन आवृत्त्या संपल्या आहेत. अवघ्या दहा दिवसांमध्ये पुस्तक तीन वेळा छापावे लागले, हा मराठी पुस्तकांच्या बाबतीत विक्रमी प्रसंग आहे. ऍमेझॉनवर पहिल्या क्रमांकावर चाललेले हे पुस्तक असून अजूनही देशातून, महाराष्ट्रातून याची मागणी होत आहे, असे ते म्हणाले होते. आता त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना या पुस्तकाची प्रत भेट म्हणून दिली आहे. त्यासोबत एक पत्रही दिले आहे.
संजय राऊत यांनी पत्रात काय म्हंटले आहे?
सर्व कुशल मंगलच असेल असा विश्वास आहे. सोबत ‘नरकातला स्वर्ग’ या माझ्या पुस्तकाची प्रत आपल्या अवलोकनासाठी पाठवत आहे. देशातील लोकशाहीविरोधी राज्यकर्त्यांनी मला खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात टाकले. माझा व माझ्या कुटुंबियांचा छळ केला. माझी कायदेशीर मार्गाने सुटका होऊ नये म्हणून न्याय यंत्रणेवरही दबाव आणला. विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी हा अत्याचार उघडपणे होत असताना सगळेच गप्प राहिले. १९७५ च्या आणीबाणी पर्वात हेच घडले व त्याविरुध्द संघ परिवाराने संघर्ष केल्याचे सांगितले जाते. माझ्या लेखनात अलीकडच्या काळातले अंधार युग चित्रित झाले आहे. आपल्याला लेखनाचा हा प्रयत्न नक्कीच आवडेल, असा टोला ही संजय राऊतांनी लगावला आहे. संघ परिवारातील अनेक मित्रांनी पुस्तक वाचून अभिप्राय कळवले आहेत, मी त्यांचा आभारी आहे, असेही संजय राऊत यांनी नमूद केले आहे.
आदरणीय सरसंघचालक
श्री.मोहन भागवत यांना “नरकातला स्वर्ग “ ची प्रत आज पाठवली.
संघ परिवारातील अनेक मित्रांनी पुस्तक वाचून अभिप्राय कळवले आहेत,मी त्यांचा आभारी आहे.
@friendsofrss pic.twitter.com/FJC0lXi6cV— Sanjay Raut (@rautsanjay61) June 7, 2025
दरम्यान, मोहन भागवत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक वाचायला हवे. त्यांच्या स्वयंसेवकांनी कष्ट करून एका उदात्त हेतूने जे सरकार सत्तेत आणले आहे, त्या लोकांनी देशाचा कसा नरक केला आहे, हे त्यांना कळायला हवे. या लोकांनी मानवी स्वातंत्र्याचा, लोकशाहीचा कसा गळा घोटलेला आहे. हे या पुस्तकातून सरसंघचालकांना समजेल, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली होती.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा