Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रमोदी त्याठिकाणी जाऊन मगरीचे अश्रू ढाळतील..; राऊतांचा मोदींना खोचक टोला

मोदी त्याठिकाणी जाऊन मगरीचे अश्रू ढाळतील..; राऊतांचा मोदींना खोचक टोला

मुंबई | Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहे. नाशिक, मुंबई, कल्याणमध्ये मोदींचा दौरा असणार आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोवरून भाजपवर जोरदार टीका केली आहे. नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर असून घाटकोपर आणि विक्रोळीत रोड शो पार पडणार आहे. यावरुनही संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली असून भाजपा आता पराभवाच्या भीतीने त्यांना गल्लोगल्ली फिरवत आहे असा टोला लगावला. पंतप्रधान मोदी घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनास्थळी भेट देतील का? असा प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले की, मोदी त्याठिकाणी जाऊन मगरीचे अश्रू ढाळतील.

काय म्हणाले संजय राऊत
‘जिथे जिथे पंतप्रधान मोदी जाणार, तिथे शिवसेना, महाविकास आघाडी जिंकणार आहे’, असा दावा देखील राऊत यांनी केला. होर्डिंग दुर्घटनेवर बोलताना राऊतांनी भाजपवर टीका केली. ‘वादळामुळे होर्डिंग पडली. या प्रकरणातील दोषींवर कारवाई झाली पाहिजे. आता शिवसेनेची सत्ता नाही. भाजपची सत्ता मुंबई महापालिकेवर आहे. तुमचे प्रशासन काय आहे, येथील पालकमंत्री काय करत आहे? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.

- Advertisement -

राऊत पुढे म्हणाले, “तुम्ही १ नाही आणि ४ रोड शो करा. पण नरेंद्र मोदी जाणार तिथे आम्ही जिंकणार हे सूत्र आहे. महाराष्ट्राच्या जनतेने मोदी नको अशी घोषणा दिली आहे. आतापर्यंत जिथे मतदान झालं आहे, तेथील ९० टक्के जागा आम्ही जिंकणार आहोत.

“महाविकास आघाडीने देशाच्या पंतप्रधानांना रस्त्यावर आणले आहे. भाजपावाले पराभवाच्या भीतीने पंतप्रधानांना रस्त्यांवर, गल्लीगल्तीत फिरवत आहेत. मुंबईतल्या ६ जागांवर आम्ही लढत आहोत. त्यातील सहाच्या सहा जागा जिंकण्याचा आमचा निर्धार आहे. नरेंद्र मोदींना मुंबईत ठाण मांडून बसावे लागत आहे. तुमच्यावर दारोदार भटकण्याची, रस्त्यावर फिरण्याची वेळ का आली हे लोकांना कळू द्या,” असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.

संजय राऊत पुढे म्हणाले, “पंतप्रधान सर्व सोडून देशभर रोड शो करत आहे, त्यांना दुसरे काम नाही का? पंतप्रधान मणिपूरमध्ये मात्र कधी गेले नाहीत, जम्मूतील काश्मिरी पंडितांचे अश्रू पुसण्यासाठी गेले नाहीत. घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून १८ लोक मृत्यूमुखी पडले, त्यांच्या मनात त्याबद्दल संवेदना नाही. आज कदाचित तिथे जाऊन ते नेहमीप्रमाणे नाटकी अश्रू ढाळतील. पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी जातील, तिथला महायुतीचा उमेदवार पडणार हे नक्की. लोक मोदींना गो बॅक बोलत आहेत.”

- Advertisment -

ताज्या बातम्या