मुंबई | Mumbai
एकीकडे राज्यात नगरपरिषदांचे मतदान सुरू आहे तर दुसरीकडे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत घडामोडींना वेग आला आहे. अशातच ठाणे महानगर पालिका निवडणूकीपूर्वी शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे, पाचपाखाडी मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान या पक्षप्रवेशामुळे मुंबईत वातावरण चांगलेच तापले आहे. शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातील शिंदेंचे शिवसेनेचे पदाधिकारी, उपविभाग प्रमुख आबा मोरे यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मातोश्रीवर आज हा पक्ष प्रवेश झाला आहे. यासोबतच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकाऱ्यांनी देखील ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यावेळी शिवसेना ठाकरे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी निवडणुक आयोगासह एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.
उध्दव ठाकरे काय म्हणाले?
मागचे काही दिवस तुम्ही पाहात आहात की मातोश्रीवर रोजच शिवसेनेत येणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यात सर्वच आहेत. इतर पक्षातले लोक आहेत, भाजपातलेही लोक येत आहेत. शिवसेनेतून दिशाभूल झालेलेही परत आले आहेत. धुळफेक होती ती आता स्पष्ट व्हायला लागली आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदेंचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.
भाजपच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही, अजित पवार निधी देत नाही
पुढे उध्दव ठाकरे म्हणाले, हवेत प्रदूषण आहे तसे राजकारणात आहे. काँग्रेसबरोबर गेले किवा उद्धव ठाकरे यांच्या नावाची चर्चा करून धूळफेक करण्याचे काम केले . भाजपच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही, अजित पवार निधी देत नाही अशी अनेक कारणे ठाण्याची लोक देत आहे. शिवसेनेची वट आजही ठाण्यात आहे.
जे मला शिव्या घालत होते त्यांच्या पोस्टरवर सोनिया गांधींचा फोटो
भाजपाने आपल्याशी दगाबाजी केली म्हणून आपण महाविकास आघाडी केली. पण नगरपरिषदेच्या वगैरे ज्या निवडणुका चालल्या आहेत, त्यात तुम्ही पाहिलं असेल की जे मला शिव्या घालत होते त्यांच्या पोस्टरवर सोनिया गांधींचा फोटो आहे. आनंद दिघेंचा फोटो आणि बाजूला सोनिया गांधी. ही सगळी सत्तेसाठीची लाचारी आहे. भाजपाकडून सरळ सांगितले जाते आहे नंबर एकलाच महत्त्व असते, क्रमांक २ चा पक्ष वगैरे नसतोच. शिवसेनेचा एक दरारा ठाण्यात होता. मात्र आता भाजपाचे कार्यकर्ते त्यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण करत आहेत. तरीही हे काही बोलू शकत नाहीत असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.
भगव्यावर वेगवेगळी चित्र लावून फसवणूक करतेय
शिवरायाचा पवित्र भगवा तसाच ठेवा.मशाल वेगळी ठेवा. भाजपने भगव्यावर वेगवेगळी चित्र लावून भाजप लोकांची फसवणूक करतेय. मशाल ही छत्रपती शिवरायांची, बाळासाहेबांची,तुमची आहे. ती तशीच आहे. या मशालीच्या आगीने द्वेशाची जळमट जळून खाक होऊन जाऊदे, असे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.
निवडणूक आयोग आणि न्यायालयबद्दल न बोललेलं बरं
यावेळी उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. निवडणूक आयोग आणि न्यायालय याबद्दल न बोललेलच बरं. नगरपरिषद निवडणुकीवर आदित्य ठाकरे पत्रकार परिषद घेऊन सविस्तर बाजू मांडणार असल्याचे ते म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




