मुंबई | Mumbai
जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) पहलगाममध्ये (दि.२२ एप्रिल) रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू (Death) झाला होता. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत या हल्ल्याचा बदला घेतला होता. या हल्ल्यावरून विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
यावेळी बोलतांना राऊत म्हणाले की, “पहलगाम हल्ला करणारे दहशतवादी गायब झाले आहे. त्यांचा शोध लागला नाही. अमेरिकन अध्यक्षच्या दबावाखाली शस्त्रसंधी करण्यात आली. यापूर्वी घडलेल्या पुलवामा घटनेतील दहशतवादीसुद्धा सापडले नाही. परंतु त्या घटनेचे राजकारण (Politics) केले गेले. आता पहलगाममध्ये देखील असेच घडले असून, त्याच्यामागे देखील राजकारण किंवा कारस्थान आहे”, असेही त्यांनी म्हटले. तसेच “तुम्ही तिन्ही सेनादलांना या युद्धातून माघार घेण्यास भाग पाडले. युद्ध जिंकत असताना माघार घेतली गेली. त्यामुळे या प्रकरणात अमित शाह (Amit Shah) यांचा राजीनामा मागायला हवा. त्यांच्या अपयशामुळेच ही वेळ आली आहे”, असा आरोपही राऊत यांनी अमित शाह यांच्यावर केला.
तसेच राऊतांनी पुढे रविवारी झालेल्या नीती आयोगाच्या (Niti Aayog) बैठकीवरून देखील मोदींवर टीकास्त्र डागले. यावेळी ते म्हणाले की, “स्वतः पंतप्रधान टीम इंडिया म्हणून काम करत नाहीत. ते भारताला विश्वासात घेत नाहीत. भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांनाही विश्वासात घेत नाहीत. प्रमुख विरोधी पक्षनेत्यांनाही विश्वासात घेत नाहीत. आता तर त्यांनी पहलगाम हल्ल्याचे राजकारण सुरू केले. नीती आयोगाच्या बैठकीत सुद्धा ऑपरेशन सिंदूरबद्दल चर्चा होते. दुसरीकडे आम्हाला पहेलगाम हल्ल्याचे राजकारण करू नका, असा सल्ला देतात. मोदी यांचे लष्करी गणवेशातील होर्डिंग, फोटो वापरुन राजकारण होत आहे”, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.
तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Raj Thackeray and Uddhav Thackeray) यांच्या युतीबाबत बोलतांना राऊत म्हणाले की, “शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः सांगितले आहे की, आम्ही मतभेद संपवून टाकणार आहोत. त्यानंतर आदित्य ठाकरे हे देखील म्हणतात की, आम्ही युतीसाठी तयार आहोत. महाराष्ट्र आणि मराठी माणूस संकटात आहे. प्रत्येक क्षेत्रातील मराठी माणसाला वाटले पाहिजे की मराठी माणूस एकत्र यायला पाहिजे. आम्ही भूतकाळात डोकावत नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा भूतकाळ आमच्यासोबत चांगला नव्हता. पण आम्ही सरकार चालवले. भविष्याचा विचार करत आम्ही एकत्र आलो. राज ठाकरे यांच्या पक्षानेही भूतकाळातून बाहेर येणे आणि भविष्याचा विचार करणे गरजेचे आहे. आम्ही त्या दृष्टिकोनातून पाऊले टाकली आहेत”, असेही त्यांनी सांगितले.