मुंबई | Mumbai
गेल्या काही काळापासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक उलथापालथ पाहायला मिळत आहे. एकीकडे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागली, तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये फुट पडल्याचे पाहायला मिळत आहे. त्यावरुन आता आरोप प्रत्यारोप सुरु झाले असून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला टोला लगावला आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये सारे काही आलबेल नसल्याचे पाहायला मिळत आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत सकाळी माध्यमांशी बोलताना म्हणाले, ‘शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काही नेते भाजपसोबत जाण्यास तयार आहेत,’ असा प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी, “सत्तेची तहान लागली असली तरी कोणी गटारातील पाणी प्यायचे नसते,” असा सल्ला त्यांनी यावेळी दिला आहे. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक नेत्यांना टोला लगावला. “तुम्ही प्रसारमाध्यमे सुप्रिया सुळे आणि अन्य काही नेत्यांची नावे घेत आहात. त्यांना नक्कीच सत्तेची तहान लागली असेल. पण तहान लागल्यावर कोणी गटारातले किंवा गढूळ पाणी पीत नाही. त्यांना सगळ्यांना नक्कीच सत्तेची तहान लागली असेल. परंतु, नेमक्या कोणत्या डबक्यात उडी मारायची किंवा महासागरात उडी मारायची म्हटले तरी लाटांचा सामना करावा लागणार आहे. महासागरात इतक्या मोठ्या लाटा उसळल्या आहेत, तिथे बरीच गर्दी आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपले स्थान शोधावे लागेल. तिकडे आधी गेलेले लोक आपल्या अस्तित्वासाठी धडपड करत आहेत. त्यात आता नवीन लोक तिथे जाऊन काय करणार?” असे म्हणत टीका केली.
हा त्यांच्या पक्षाता अंतर्गत विषय आहे
राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक मोठा गट आणि त्या गटाचे नेतृत्व करणारे मोठे नेते भाजपसोब जाण्यास व्याकूळ आहेत पण शरद पवारांनी अजून काहीच निर्णय घेतलेला नाही, त्यांनी नव्या पिढीवर निर्णय सोपवला आहे अशी चर्चा सुरू असल्याचे विधान राऊतांसमोर एकाने केले. त्यावर राऊतांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली.
हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. पण मला जे ज्ञान आहे, त्यानुसार शरद पवार हे भाजपसोबत जाणार नाहीत. शरद पवार साहेबांनी राजकारणामध्ये खूप मोठी इनिंग खेळली आहे, अजूनही ते खेळत आहेत. आता ते प्रत्यक्ष मैदानावर नसले तरी ते कोचिंगच्या भूमिकेत आहेत. मी त्यांना ओळखतो, त्यांची विचारधारा आणि भूमिका मला माहीत आहे. ते आता ८५ वर्षांचे आहेत, पण अशा नेत्यांना काम करताना वयाचे बंधन नसते. त्यामुळे आत्तापर्यंत शरद पवार यांची जी भूमिका, विचारधारा होती ते पाहिल्यानंतर ते भारतीय जनता पक्षासोबत किंवा अशा विचारांच्या लोकांसोबत ते कधीच जाणार नाहीत, असा मला ठाम विश्वास आहे, असे राऊत म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा