श्रीरामपूर|प्रतिनिधी|Shrirampur
श्रीरामपुरातील मुख्य रस्त्यांच्या मध्यभागी बसणार्या मोकाट जनावरांमुळे या मुख्य रस्त्यांवर वाहतूक ठप्प होवून जाते. तरी या मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे. या जनावरांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात आला नाही तर एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
गेल्या अनेक दिवसापासून शहरात मोकाट जनावरांचे प्रमाण वाढले आहेत. ही जनावरे काही ठिकाणी उभे राहत असतात तर काहीवेळेस रस्त्याच्या मध्यभागी बसून असतात. त्यामुळे रस्त्यांवरुन जाणारी वाहतूक ठप्प होते. तसेच या मोकाट जनावरांपासून पायी जाणार्या नागरिकांनाही धोका होवू शकतो. तसेच ही जनावरे हुंदडली तर एखादा मोठा अपघात होवू शकतो अथवा मोठी दुर्घटना घडून एखाद्याचा जीवही जावू शकतो. अशा मोकाट जनावरांचा कळप शहरातील भगतसिंग चौक, गिरमे चौक अथवा जय भवानी चौकात कायमच असतो.
सदरची जनावरे कोणाची आहे याचा शोध नगरपालिकेने लावावा व संबंधित जनावराच्या मालकांना या जनावरांना सांभाळण्याबाबत तंबी द्यावी. त्यांची जनावरे पुन्हा अशी रस्त्यांवरुन मोकाट फिरतांना आढळली तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा द्यावा. अन्यथा नगरपालिकेने अशा जनावरांना प्राण्यांच्या कोंडवाड्यात बंदीस्त करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पुन्हा अशा प्रकारे कोणतेही जनावरे शहराच्या मुख्य रस्त्यांवर फिरणार नाही अशी व्यवस्था पालिकेने करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.