Tuesday, June 16, 2026
Homeनगर‘श्रीरामपूर जिल्हा’ व्हावा ही श्रीरामपूरकरांची इच्छा

‘श्रीरामपूर जिल्हा’ व्हावा ही श्रीरामपूरकरांची इच्छा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होऊन श्रीरामपूर जिल्हा व्हावा, हा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. यासाठी अनेक आंदोलने, मोर्चे, श्रीरामपूर बंदची हाक, सह्यांची मोहीम तसेच याबाबत अनेक नेत्यांना निवेदने देण्यात आली. परंतु श्रीरामपूर जिल्हा व्हावा, या मागणीला अद्यापही मूर्त स्वरुप आलेले नाही. श्रीरामपूर जिल्हा व्हावा, ही प्रत्येक श्रीरामपूरकरांची तीव्र इच्छा आहे. सर्व काही अनुकूल असताना घोडे नेमके अडले कुठे? असा प्रश्न श्रीरामपूरकर विचारू लागले आहेत. श्रीरामपूरला गतवैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर श्रीरामपूर जिल्हा झालाच पाहिजे, यासाठी येथील सर्व नेत्यांनी तसेच नागरिकांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे.

- Advertisement -

श्रीरामपूर जिल्हा निर्मितीबाबत भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे यांनी अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होऊन जिल्हा निमिर्तीचा विषय आला तर श्रीरामपूरच जिल्हा झाला पाहिजे ही तमाम श्रीरामपूर तालुका व शहरातील जनतेची तीव्र इच्छा आहे. आता हा विषय भावनिक झाला आहे. श्रीरामपूर जिल्हा व्हावा या मागणीसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा देखील सुरू आहे. श्रीरामपूरचे गतवैभव प्राप्त करायचे असेल तर श्रीरामपूर जिल्हा होणे गरजेचे असल्याचे मत दीपक पटारे यांनी व्यक्त केले.

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे यांनी श्रीरामपूर जिल्हा निमिर्तीचा विषय अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. यासाठी केवळ आंदोलनेच सुरु आहेत. परंतु केवळ आंदोलने करुन काहीच होणार नाही. सध्या जे सत्तेमध्ये आहेत, त्यांनी जिल्ह्याचा विषय मार्गी लावावा, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यावेळी आम्ही हा विषय लावून धरला होता. परंतु करोना काळात हा विषय प्रलंबित राहिला. त्यानंतर सरकार पडल्याने काहीच करता आले नाही. परंतु आता पुन्हा एकदा हा विषय ऐरणीवर आला असून जिल्ह्यासाठी एकी दाखविण्याची वेळ आली आहे, असे मत सचिन बडदे यांनी व्यक्त केले.

आपचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल यांनी अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन झाल्यानंतर प्राधान्याने श्रीरामपूरच जिल्हा व्हावा, यासाठी श्रीरामपूर शहर व परिसरात सर्व सुखसोयी उपलब्ध आहेत, परंतु राजकीय इच्छाशक्ती नसल्या करणाने श्रीरामपूर जिल्ह्याचा विषय बाजूला पडलेला आहे. त्यामुळे श्रीरामपूर जिल्हा या मागणीसाठी अबालवृध्दांबरोबरच सर्वच नागरिकांनी रस्त्यावर उतरुन मोठे आंदोलन उभारण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...