अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
सिस्पे-इन्फिनिटी कंपन्यांच्या आर्थिक घोटाळाप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या दोन प्रमुख एजंटांचा जामीन अर्ज श्रीगोंदा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने नामंजूर करत गुन्ह्याची गांभीर्यता अधोरेखित केली आहे. विक्रम गाडीलकर आणि कैलास वाळुंज अशी जामीन अर्ज नामंजूर केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
या घोटाळाप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. पोलिसांनी गाडीलकर व वाळुंज यांना अटक केली आहे.
तपासादरम्यान विक्रम गाडीलकर याच्याकडे मोठ्या रक्कमेची हाताळणी झाल्याचे उघड झाले आहे. या घोटाळ्यात त्याचा भाऊ विनोद बबन गाडीलकर हा सुपा परिसरातील कंपनीचा मोठा एजंट असल्याचे समोर आले आहे. गाडीलकर कुटुंबियांनी स्वतःवरून दोष झटकण्यासाठी कंपनी संचालकांविरूध्द खासगी फिर्याद दाखल करण्यासाठी न्यायालयाचा आदेश मिळवला. मात्र, तपासातून तेच आरोपी ठरले, ही बाब लक्षवेधी ठरली. या जामीन अर्जाच्या सुनावणीदरम्यान फिर्यादी व साक्षीदार सुशील घोडके यांच्यावतीने शुभम साके आणि प्रेरणा धेंडे यांनी प्रभावी युक्तिवाद सादर केला.
त्यांनी न्यायालयासमोर घोटाळ्याची व्याप्ती, गुंतवणूकदारांचे आर्थिक शोषण, आरोपींच्या संगनमताने झालेली फसवणूक अधोरेखित केली. या आरोपींनी गुंतवणूकदारांची फसवणूक करून रक्कम परदेशात हलवली असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा मुद्दा साके यांनी मांडला. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन वरच्या स्तरावरील तपास यंत्रणेची नेमणूक करावी, अशी गुंतवणूकदारांची मागणीही न्यायालयासमोर करण्यात आली. सर्व बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने विक्रम गाडीलकर आणि कैलास वाळुंज या दोघांचे जामीन अर्ज नामंजूर केले आहे.




