अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरात रविवारी (2 नोव्हेंबर) पहाटेच्या वेळी कत्तलीच्या उद्देशाने गोवंश जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करणारी दोन वाहने गोरक्षकांनी पकडली. त्यातून चार गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे. जनावरे, दोन वाहने व एका वाहनातील दोघांना तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. एका वाहनावरील चालक पसार झाला आहे. एकूण 7 लाख 40 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी अखिल भारतीय कृषी गो सेवा संघाचे कार्यकर्ते अमर शिवाजी सैंदर (वय 24, रा. गुलमोहर रस्ता, सावेडी) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोसीन महमुद खान (वय 42) व मतीन गफार कुरेशी (वय 45, दोघे रा. कोठला) व एक अनोळखी विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास, छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरून दोन वाहनांमधून गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी नेले जात असल्याची माहिती सैंदर यांना मिळाली होती. त्यांनी सहकारी गोरक्षक ईश्वर शिंगाडे, ओम दौन्ता आणि सुरज ठोकळ यांना सोबत घेऊन गुलमोहर रस्त्यावर सुरभी हॉस्पिटलजवळ सापळा रचला.
संशयित पिकअप (एमएच 16 एवाय 6436) राँग साईडने येताच पकडले. त्याचा चालक पसार झाला. त्यातून दोन जनावरांची सुटका केली. तर दुसरे एक वाहन याच मार्गावरून आले. गोरक्षकांनी थांबण्याचा इशारा करताच, चालकाने वाहन पळविले. गोरक्षकांनी पाठलाग करून तारकपूर परिसरात पकडले. त्यातील दोघांना ताब्यात घेतले व दोन गोवंशीय जनावरांची सुटका केली. घटनेची माहिती तोफखाना पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी दोन वाहने, चार जनावरे व दोघा संशयितांना ताब्यात घेतले. तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार बाळासाहेब गिरी करीत आहेत.





